-हिमांशू
आपत्ती दोन प्रकारच्या असतात- नैसर्गिक व मानवनिर्मित. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे नैसर्गिक आपत्तींची वारंवारिता वाढलेली आहे आणि यापुढेही ती वाढतच जाईल, असे संकेत आहेत. मानवनिर्मित आपत्तींची संख्या कमी केली जाऊ शकते. परंतु नैसर्गिक आपत्तींना जबाबदार असलेली कारणं दूर करण्यासाठी काडीचेही प्रयत्न होत नसल्यामुळे बचावासाठी आपत्कालीन यंत्रणा उभी करणं आणि जनसामान्यांना त्याबाबत प्रशिक्षित करणं हाच सद्यःस्थितीत सर्वोत्तम पर्याय आहे, असं आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. अर्थात आपल्याला बरेच तज्ज्ञ बरंच काही सांगत असतात.
आपण ऐकतो किती, हे महत्त्वाचं आहे. शहाणपण देण्याची व्यवस्था आपल्या समाजात ङ्गार पूर्वीपासून आहे; पण शहाणं व्हायचंच नाही, असा निर्धार असेल तर कोण काय करणार? सुरक्षिततेसंबंधी दिलेल्या सूचना ऐकणं आपल्याला कंटाळवाणं वाटतं. वाचण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे अतिवृष्टी, भूस्खलनासारखं संकट असो वा मानव-वन्यजीव संघर्षासारखी अचानक उद्भवणारी घटना असो, कुणाचंही न ऐकता लोक त्याला सामोरे जातात आणि नुकसान वाढतं. आपत्ती व्यवस्थापन हा संपूर्ण विषय, ऐनवेळी काय-काय घडू शकतं, या अनुमानावर उभा आहे. परंतु ते घडेपर्यंत आपल्याला जाग येत नाही. या पार्श्वभूमीवर जपानमधली घटना लक्ष वेधून घेते. नागरिक म्हणून जगताना शिस्तीचं पालन केलं, म्हणून तब्बल 367 विमान प्रवाशांचे प्राण वाचले.
जपानला भूकंप नवा नाही. तसा तो महाराष्ट्रालाही राहिलेला नवा नाही; पण इथे भूकंप नावाच्या भौगोलिक घटनेचा विचार केला आहे. जपानमधील ताजा भूकंप 7 रिश्टरपेक्षा अधिक क्षमतेचा होता आणि त्यापाठोपाठ त्सुनामीही उसळली होती. भूकंप होत असताना नेमकं एक विमान टोकिओ विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत होतं आणि जमीन थरथरल्यामुळे त्याची दिशा बदलली. सुरक्षा दलाचं एक विमान जवळच उभं होतं आणि हे प्रवासी विमान वेगाने त्याला धडकलं. अपघातानंतर क्षणार्धात आगीचा लोळ दिसला आणि विमानातलं कुणीही जिवंत राहणं शक्य नाही, असं हा स्ङ्गोट बघणार्यांना वाटलं. परंतु 367 प्रवासी आणि जपान एअरलाइन्सचे 12 कर्मचारी सुखरूप बचावले. ही खरोखर जादू असावी, असंच पाहणार्यांना वाटलं.
परंतु आपत्ती व्यवस्थापनाचे धडे आत्मसात केल्याचा तो परिणाम होता. अपघाताच्या दोन तास आधीच सुरक्षिततेसंबंधीचा एक व्हिडिओ विमानातील कर्मचार्यांनी प्रवाशांना दाखवला होता. आपत्ती ओढवल्यास काय करायचं आणि काय टाळायचं, याची माहिती देणारा तो ‘बोअर’ व्हिडिओ कोण इमानदारीत बघणार? पण जपानी माणूसच वेगळा. प्रवाशांनी व्हिडिओतल्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन केल्यामुळे सगळेच बचावले.
अपघात झाल्यावर आपल्या बॅगा वगैरे शोधत बसण्याऐवजी स्वतःचा बचाव करावा, आग लागली तर ती वेगानं पसरण्याची कारणं कोणती आणि ती कशी टाळायची, याची माहिती प्रवाशांनी आत्मसात केली आणि सूचनांचं पालनही केलं. कर्मचार्यांनी प्रवाशांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेच; पण गांगरून न जाता, विनाकारण धावाधाव, आरडाओरडा न करता प्रवाशांनी त्यांना सहकार्य केलं, हे अधिक महत्त्वाचं. आपल्याकडे दिलेल्या सूचना मोडता कशा येतील, याचा विचार आधी केला जातो आणि लोक हकनाक जीवाला मुकतात.