“सदा तूपरोटी इथे श्वान खाते… तिथे सान बाळे भुकेली दुधाते,’ अशा शब्दांत या देशातल्या विषमतेचं दाहक वर्णन शाहीर साबळे यांनी त्यांच्या “बापाचा बाप’ या वगनाट्यात केलं होतं. सत्तरीच्या दशकाचा तो काळ. आता परिस्थिती खूपच टोकाला गेली. विशेषतः नव्वदीच्या दशकानंतर गरीब-श्रीमंतातलं अंतर इतकं वाढलं, की एका कप्प्यातल्या लोकांना दुसऱ्या कप्प्यातल्या लोकांचं दर्शनही दुर्लभ झालं.
दोन वेगवेगळी विश्वं तयार झाली आणि दोहोंमध्ये एक भक्कम पोलादी भिंत उभी राहिली. कुणी म्हणालं, “भारत विरुद्ध इंडिया’ असा हा मामला आहे, तर कुणी “श्रीमंत होणं हा काही गुन्हा नव्हे,’ असं म्हणून “उद्योजकता’ या एकाच शब्दांत नीतिमत्तेची पुरती वासलात लावून टाकली. या सगळ्या गोष्टी विषमतेला खतपाणी घालणार आणि भविष्यात इथं टोकाचे विरोधाभास दिसणार हे तेव्हाच निश्चित झालं होतं. कारण स्वतःच्या पायापुरती वहाण कापणाऱ्यांची पिढी आकार घेऊ लागली होती. आज वरपासून खालपर्यंत सगळे “सेल्फी’तच मग्न आहेत, इतका आत्मकेंद्रीपणा वाढलाय.
दुसरीकडे शोषणाने इतके हातपाय पसरलेत, की केवळ एका आजारावर उपचार घेतले, एवढं कारण मध्यमवर्गातून गरीब वर्गात जाण्यास पुरेसं ठरलंय. लोकांची पापं धुऊन काढणाऱ्या गंगेतून वाहत आलेले चाळीसहून अधिक मृतदेह या परिस्थितीवर झगझगीत प्रकाशझोत टाकणारे ठरलेत. या घटनेचा अर्थ लावायचा तरी कसा?
एके दिवशी भल्या सकाळी गावातल्या लोकांना नदीच्या किनाऱ्यावर असंख्य मृतदेह पाण्यात तरंगताना दिसतात. तीन-चार दिवसांपूर्वी मृत्यू झालेले असल्यामुळे बहुतांश मृतदेह फुगलेले असतात.
नेमकी कोविड-19 ची साथ सुरू असताना घडलेला हा प्रकार अनेक प्रश्नांना जन्म देणारा ठरतो. कुठले हे मृतदेह? कुणाचे? नदीत का टाकले? कुणी? बिहारच्या चौशा जिल्ह्यात घडलेली ही घटना जितकी हृदयद्रावक तितकीच भयावह! हे मृतदेह करोनाबाधितांचे असावेत आणि अंत्यसंस्कारांसाठी जागा न मिळाल्याने नदीत सोडून दिले असावेत, अशी शंका व्यक्त केली जाते. काहीजण तर अंत्यसंस्कार महागल्यामुळे असं घडलं असल्याचा तर्क मांडतात. मृतदेह बिहारमधले नसून उत्तर प्रदेशातून वाहत आल्याचा आरोप केला जातो. उत्तर प्रदेशकडून तातडीने कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. करोनाने मृत्यू स्वस्त केलाय; पण अंत्यसंस्कार अजून महागच आहेत. नदीत सोडलेल्या मृतदेहांमुळे बिहारमध्ये गावागावांत संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जातेय.
या अमानवी घटना आपल्याच देशात का घडतायत? या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण सारे बांधिल आहोत. इंजेक्शनचा काळाबाजार, बेड मिळवून देण्यासाठी लाच अशा घटना आपण सर्रास घडताना पाहतो आहोतच; पण बिहारमधली घटना विषमतेनं निर्माण केलेल्या अगतिकतेवर प्रकाश टाकणारी ठरते.
करोनामुळे एकीकडे असे प्रसंग घडत असतानाच हरियाणामध्ये मात्र कुत्र्याला “कुत्रा’ म्हटल्यामुळे चिडून मारहाण करणारा श्वानमालक आपल्याला भेटतो. या विरोधाभासाकडे डोळसपणे पाहायला हवं. या महाशयांनी कुत्र्याचं नाव “टॉमी’ ठेवलंय. तो लोकांच्या अंगावर धावून जातो म्हणून त्याला बांधून ठेवण्याची विनंती शेजाऱ्यानं केली. मालकाला विनंतीचा नव्हे तर “टॉमी’ला “कुत्रा’ म्हटल्याचा राग अनावर झाला आणि त्यानं शेजाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला काठीनं बदडलं. याच विरोधाभासाचा आपल्याला भविष्यात सर्वाधिक धोका आहे.