राजेंद्र भुजबळ
शिर्डी – ऐन उन्हाळ्याचे दिवस. पारा 44 डिग्री सेल्सिअस आणि त्यातच नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शंकरन यांनी साई संस्थान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात पादत्राणे घालून प्रवेश करता येणार नाही, असं परिपत्रक काढलं आणि एकच खळबळ उडाली. कारण भर उन्हात साफसफाई करणारे कामगार आणि इतर कामासाठी ये-जा करणारे कामगार यांच्या पायाला चटके बसत होते, तर अनेक महिला भाविक लहान मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक यांचे मंदिर परिसरात अनवाणी चालताना होत असलेले हाल फक्त बाबांवर असलेल्या श्रद्धेमुळे सर्वजण सहन करत आहे.
वरिष्ठांच्या आदेशाचा आदर करत सर्व कर्मचारी भर कडक उन्हात हा त्रास सहन करत असले, तरी हा निर्णय किती चुकीचा आहे यावर अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. वास्तविक साई समाधी मंदिर ही एक पुरातन वास्तू आहे. मंदिराचा परिसर एल अँड टीसारख्या कंपनीने विकसित करताना अनेक गोष्टींचा विचारच केला नाही. कारण पूर्वी साई समाधी मंदिराच्या पहिल्या माळावर भाविकांची राहण्याची सोय होती, तर अगदी मंदिरासमोर भोजनालय होते.
त्यामुळे पादत्राणे मंदिर सोडून इतर ठिकाणी भाविक सहजपणे घालून वावरत असे.भाविकांना निवांत बसण्याची सोय नाही. संग्रहालय, लेंडी बाग, द्वारकामाई, नंदादीप व इतर ठिकाणी जाताना भाविकांना अनेक चकरा माराव्या लागत असून, त्यासाठी मार्गदर्शक फलक नसल्याने आजही अनेक भाविकांची कुचंबणा होत आहे. मात्र, आता अपुरे चप्पल स्टॅंड, उन्हाचा तडाखा आणि कुठलाही विचार न करता केवळ मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी परिसरात पादत्राणे यावर केलेली बंदी हा निर्णय अजब वाटत आहे.
दुसरीकडे मंदिरात राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर व्हीआयपी येण्याच्या अगोदर त्यांना रेड कारपेट टाकले जातात. मग सर्वसामान्य भाविक, कर्मचारी यांच्या पायाला भर उन्हात चटके बसून होणाऱ्या वेदना साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या आधी का समजल्या नाहीत, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, मंदिर परिसराच्या चारही गेटवर पुरेसे असे सुरक्षित चप्पल स्टॅंड असावे, तसेच भाविक, कर्मचाऱ्यांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नये, म्हणून मंदिर परिसरात सावली, तसेच मॅट पुरेशा प्रमाणात असाव्यात याची काळजी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे, ” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले.