आपल्या जन्मापासूनच आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेलं असतं. आपलं स्वतःचं आयुष्य प्रत्येकजण आपापल्या पिंडानुसार व्यतीत करत असतो. आपल्या आवडी-निवडी, विचार-आचार, उठणे-बसणे, चालणे-बोलणे, हसणे-रुसणे हे सर्व काही इतरांपेक्षा नेहमीच भिन्न असतं. प्रत्येकाचा पिंड निराळा असतो, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. आपलं स्वातंत्र्य अबाधित राहावं असंही अनेकदा वाटत असतं, ते स्वाभाविकही आहे. आपल्या वक्तृत्वामुळे, नेतृत्वामुळे आणि कर्तुत्वामुळे प्रत्येकाची ओळख होत असते. काही जणांची ओळख त्यांच्या दातृत्वामुळे, मातृत्वामुळे किंवा पितृत्वामुळे होत असते. यांपैकी आपलं व्यक्तिमत्त्व कोणत्याही कारणांमुळे स्वतंत्र अस्तित्व बनवत असलं, तरीही त्या व्यक्तिमत्त्वाची नाळ कोणा-ना-कोणाशीतरी जोडलेली असते.
व्यक्ती म्हणून कितीही स्वतंत्र अस्तित्व असलं तरीही शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक पातळीवर कोणतीही व्यक्ती एकट्यानं जीवन आनंदी करू शकतेच असं नाही. प्रत्येकाला कोणाची का होईना पण साथ, सोबत, संगत हवी असतेच. शरीरानं जसं फार काळ कोणी एकटं राहू शकत नाही, तसंच मनानं देखील एकलेपण अधिक काळ सुखावह ठरत नाही.
जगण्यापलीकडचं जीवन
आपल्याला आयुष्य जगण्यासाठी सद्य:स्थितीत पैसाच लागतो, पण जीवन आजमावण्यासाठी कोणाचीतरी साथ, सोबत, संगत लागत असते. तुझं माझं जमेना, पण तुझ्याविना करमेना, अशी स्थिती असली, तरीही आपल्याला ते मान्य होतं. आपल्यापैकी प्रत्येकाला सहजीवनाची गरज भासतेच. कदाचित, प्रत्येकाची तशी मानसिकता आयुष्यातील निरनिराळ्या टप्प्यांवर येत असते. प्रत्येकाच्या मानसिक पातळींवर होत असलेल्या निरनिराळ्या स्थित्यंतरांवर ही गरज कमी-अधिक होत असते. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक अथवा शारीरिकदृष्ट्या जरी एकटं आयुष्य जगणं एखाद्यानं पसंत केलं अथवा स्वीकारलं, तरीही त्याला मानसिकदृष्ट्या काहीवेळा, काहीबाबतीत जाणवणारा एकलेपणा मात्र आंतरिक अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो, मानसिक ताण-तणावाचा अनाकलनीय दबाव उत्पन्न होत राहतो. प्रत्येक व्यक्तीला सहजीवनाची गरज, ही मानसिक पातळीवर अधिक आवश्यक असते. सहजीवनाच्या प्रवासाचा तेव्हाच प्रयास वाटत नाही, जेव्हा सकारात्मक दृष्टीकोनातून तो केला जात असतो. आपल्या सुख-दु:खात, आयुष्यातील चढ-उतरात सह-प्रवासी देखील आपली साथ-सोबत करणारा असणं योग्य ठरतं. ती साथ-सोबत देखील जीवन के साथ भी; जीवन के बाद भी, अशीच असणं अभिप्रेत असतं. सकारात्मक सहजीवन जगता येणं ही केवळ कला नसून ते एक शास्त्र आहे. ह्या शास्त्रात संवाद, सहवास, सहभाग, सहकार आणि सम-भोग या बाबींचा कृतीशील विचार करावा लागतो, त्यांचा अंगीकार करणं आवश्यक ठरतं. सहजीवन सकारात्मक आणि आनंदी करण्यासाठी साथ-सोबत करणाऱ्या प्रत्येकानं कर्तव्यापोटी स्वीकारलेली जबाबदारी समसमान घेतलेली असणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. तशी जाणीव होणं महत्त्वाचं ठरतं.
संवाद, सहवास, सहभाग आणि सहकार
संवाद ह्या शब्दातील तीनही अक्षरं एकमेकांना आहेत त्याच क्रमात लावून चिकटवून ठेवायची असतात. त्यांचा क्रम जरी बदलला अथवा संवाद ह्या शब्दातील पहिलंच अक्षर गळून पडलं, तर शिल्लक राहतो फक्त वाद. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबपद्धतीत आपापसात संवाद साधायला तेवढा गोतावळा नाही. काही काळापर्यंत “हम दो: हमारे दो’ चा जमाना होता, कालांतरानं घर तिघांचं झालं. कदाचित लिव्ह इन रिलेशन संस्कृतीचं वेड पांघरलेल्या व्यक्ती तर, आपत्य ही आपत्ती असल्याची प्रतिक्रिया देतात. त्यातच समाज माध्यमांचा (सोशल मीडियाचा) अनेकांवर असलेला पगडा आणि एकूणच व्हर्च्युअल संवादाची निर्माण झालेली ओढ, ह्यांमुळे परस्परांतील संवादाचं स्वरूप बदलल्याचं स्पष्ट चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे. संवादाच्या अभावामुळे परस्परांवरील प्रभाव कमी होत चाललाय. ह्याची जाणीव न होणं, हीच खरं तर उणीव आहे. संवादाच्या अभावामुळेच एकमेकांचे स्वभाव समजत नाहीत. प्रत्येक व्यक्तीचं व्यक्त होणं हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतं.
काहीतरी बोला, असं म्हटलं तर काही जणांच्या प्रतिक्रिया अशा असतात की, काय बोलू? आपलं व्यक्त होणं हे नेहमी शाब्दिकच हवं असं काही नाही, आपल्या देहबोलीतून देखील आपापसातील संवाद चांगला होऊ शकतो. काहीवेळा, मूकसंवाद देखील खूप काही सांगून जातात. त्यासाठी आभासाची नाही तर अभ्यासाची जरुरी असते. संवादात अनेकदा त्याचीच उणीव भासते. संवादाची उणीव असल्याची जाणीव झाली नाही तर केवळ परस्परांमध्ये दुरीच नाही, तर दरी निर्माण होऊ लागते. मग, मला असं वाटलं, मी असं म्हटलंच नव्हतं, माझ्या बोलण्याचा नेहमीच विपर्यास केला जातो, मी बोललेलं कळतच नाही, मला बोलायची इच्छाच नाही अशा स्वरूपातील काही प्रतिक्रिया आपल्याला अनकेदा ऐकू येत असतात. संवाद साधण्यासाठी प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करणं गरजेचं असतं. सहजीवनातील प्रत्येक समस्येवरचा उत्तम इलाज म्हणजे संवाद. त्याला “सु’ हे विशेषण लावून सुसंवाद साधण्याचं कौशल्य आत्मसात करणारा नेहमीच यशोशिखरे गाठू शकतो.
संवादात समाधान मिळत असतं, तर सहवासात सुख मिळतं. दहा शब्दांच्या मेसेज पेक्षा दोन शब्दांमध्ये बोलणं चांगलं वाटतं. त्याहीपेक्षा, शब्दविरहीत सहवास अधिक भावतो, हवाहवासा वाटतो. काहीवेळा ह्या सहवासांत स्पर्शाचा अभाव असला तरीही सुखद अनुभवांची प्रचीती येत असते. सहजीवनात सहवास अधिक गरजेचा आणि म्हणूनच आवश्यक असतो. सहवासानं शारीरिक एकटेपणा आणि मानसिक एकलेपणा संपुष्टात येण्यास मदत होत असते. सहजीवनातील सहवासात स्पर्शाची आश्वस्त करणारी सकारात्मक ऊर्जा, ताकद सामावलेली असते. ह्या आश्वस्त करणाऱ्या शक्तीमुळे मानसिक एकलेपणातील अस्वस्थता दूर जात असते. सहवासात एक निराळं नातं निर्माण होत असतं. सहजीवनातील सहवासात परस्परांमध्ये एक ओढ निर्माण होत असते, नाळ जोडली जात असते. अवघ्या काही क्षणांच्या शारीरिक सहवासात, शरीरापेक्षा मानसिक आणि आंतरिक समाधानाचे सुखद अनुभव अधिक निरंतर काळापर्यंत मनावर कोरले जात असतात.
मी आणि माझं पेक्षा आपलं महत्त्वाचं
आपलं म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचा अथवा गोष्टीचा मनापासून स्वीकार करतो तेव्हाच त्यांमधील आपला सहभाग वाढत जातो. तुझं-माझं करण्याच्या विचारांमुळे असणारा सहभाग केवळ माझ्या स्वत:शी संबंधित गोष्टींशीच राहतो. आपण सहजीवनाचा एकदा स्वीकार केला तरीही, का बरं करतो असं? अनेकदा घडणाऱ्या काही घटना, घडामोडी ह्या निसर्गनियमांमुळे सुरू असल्यासारखं वाटतं. कदाचित सहभागाचा अभाव असल्याचं ते महत्त्वाचं कारण असावं. सहभागाचा आनंद हा केवळ त्याची प्रचीती आल्याशिवाय मिळत असतो. आपल्या भागाचं, वाट्याचं, नावचं, कर्तव्याचं भान ठेवून सहजीवनात सहभागी होणं महत्त्वाचं असतं. आनंदप्राप्तीसाठी सकारात्मक वातावरणाची निर्मिती करत राहणं गरजेचं असतं. सहजीवनात सहकाराच्या, सहकाऱ्याच्या आणि सहकार्याच्या भावनाप्रधान विचारानं, मदतीनं सकारात्मक वातावरणाची निर्मिती होत असते. एकमेकांच्या जीवनात अनावधानानं निर्माण झालेल्या असहकाराच्या विचार, वर्तन आणि व्यवहारानं निर्माण होणारी नकारात्मकता अनेकदा नैराश्यास कारणीभूत ठरत असते. मी आणि माझं ह्या भावविश्वात अडकलेल्या व्यक्ती सहजीवानात सकारात्मकता आणू शकतातच असं नाही. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा, इतरांचा विचार करणारी व्यक्ती नकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. अनेकदा मला खूप काही करायचं असतं, पण सहकार्यच मिळत नाही, असे सूर अनेकांच्या तोंडून निघत असतात. सहजीवनात समजून सांगण्याची नाही, तर समजून घेण्याचीच गरज अधिक असते. केवळ आपल्यालाच सगळं कळतं, ह्या भ्रमांत सहकाराची भूमिका कधीच बजावली जात नसते. जाणूनबुजून काहीही जाणून घ्यायचं नाही, अशा मानसिकतेत सहकाऱ्याची बाजू, त्याची कुवत असून देखील, कमकुवत होत राहते.
सम-भोग
सहजीवनात सम-भोगही महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकाच्या प्रारब्धातील भोग सहजीवानात सम-समान असले, तर पुढील जीवनात येणारे योग देखील समसमान अनुभवायला मिळू शकतात. सुख के सब साथी; दुख में ना कोई, अर्थात सुखाचा आनंद प्रत्येकाला हवा असतो, पण दु:खात सम-भोग घ्यायची मानसिकता नसते, दुसऱ्याचं दु:ख भोगण्याची, वाटून घेण्याची, त्यांत सहभागी होण्याची तयारी नसते. सहजीवनात सुख, दु:ख ह्या प्रत्येक प्राप्त परिस्थितीचा आनंदानं, सामूहिकरीत्या स्वीकार करावा लागत असतो. सहजीवनात तुझं-माझं करून चालत नाही, तिथे नेहमीच आपलेपणाची भावना असावी लागते. जीवनातल्या भोगापेक्षा सहजीवनातला योग मोठा, महत्त्वाचा असतो. हल्लीच्या व्हर्च्युअल जमान्यात संवाद, सहवास दोन्हीही इतिहासजमा होत चाललं आहे. संवाद होतो म्हणा तसा, पण व्हर्च्युअल पद्धतीने, प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर बोलूनही नाही, तर व्हॉट्सऍपद्वारे. त्यामुळे सहवासाचा तर प्रश्नच येत नाही. दिवसेंदिवस निर्माण होत जात असलेल्या ह्या दुराव्याला रक्ताच्या नात्याचा ओलावा राहण्याची शक्यता कमी होत असल्याचं जाणवतं. अशावेळी बादरायण संबंधांचा तर विषयही मनाला स्पर्श करण्याचं कारण नाही. ह्या व्हर्च्युअल जमान्यानं पती-पत्नीचं नातं संपवायचं काम केलं आहे का? एक काळ असा होता, जिथे नव्यानं नाती निर्माण केली जायची. काही वेळा तर ती रक्तापलीकडची असून सुद्धा अधिक घट्ट असायची. अलीकडील काही दिवसांत अगदी मोजक्याच नात्याचं कुटुंब आपल्याच भावविश्वात रममाण झालेलं दिसून येतं. अर्थात याला बदलत चाललेली जीवनशैली, मानसिकता की व्हर्च्युअल जगाची उत्पत्ती कारणीभूत आहे? हाच कळीचा मुद्दा आहे.
भोगवादी संस्कृतीचं अनुकरण न करता आपल्या सकारात्मक सहजीवनासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या यादीत आपण येण्यास समर्थ आहोत, ह्या जाणिवेतून आवश्यक ते बदल मी माझ्यापासूनच करणार आणि ते देखील मी एक कर्तव्यदक्ष, सुज्ञ, सुजाण, सजग मनुष्यप्राणी आहे म्हणून, असा निर्धार केला आणि तशी कार्यकृती करायला सुरुवात केली की, सुख, समाधान, शांती ह्या तिन्हींची अनुभूती येणारच आणि लग्न निश्चितच मग्न करणारं ठरणार.
प्रा. शैलेश कुलकर्णी