भुवनेश्वर : घरी परतण्यासाठी आधिर झालेले स्थलांतरीत जीवावर उदार झाले आहेत. याचा प्रत्यय ओडिशात आला आहे. मच्छीमारीच्या बोटीतून आंध्र प्रदेशातून परतण्याच्या प्रयत्नातील 39 जण भर समुद्रात अडकून पडले आहेत.
चेन्नईहून अशाच बोटीतून परतलेल्या 38 जणांची ओडिशा सरकार चौकशी करत आहे. त्याचवेळी बोटीतील पेट्रोल संपल्याने भर समुद्रात 39 जण अडकून पडल्याची घटना समोर आली आहे.
आंध्र प्रदेशातील पलसा जवळ ही बोट भर समुद्रात अडकली आहे. या बोटीत 15 जण आंध्रातील आहेत तर 24 जण ओडिशातील आहेत. या 24 पैकी 11 शेतकरी रामायपटणम येथील रहिवासी आहे. तर नऊ जण पटीसोनपूर येथील रहिवासी आहेत. तीन जण मरकंडी तर एक जण डिगीपूर येथील मुळचे नागरिक आहेत.
या बोटीतील नागरिकांच्या मदतीसाठी रामायपटणम येथून डिझेल पाठवण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत बेरहमपूरचे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा म्हणाले, याबाबतची माहिती मला मिळाली आहे. त्याबाबत खातरजमा करण्याचे आदेश सागरी पोलिसांना देण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत त्यांच्याकडून याबाबतची माहिती मिळणे अपेक्षित आहे.
दरम्यान, मच्छिमारी करणाऱ्या बोटीतून सलग पाच दिवस प्रवास करत चेन्नईहून आलेले ओडिशातील 28 जण आणि आंध्र प्रदेशातील 10 जण गंजम जिल्ह्यातील पाटी सोनपूर येथील किनाऱ्यावर उतरले. ही माहिती समजताच जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ओडिशाचे वाहतूक मंत्री पद्मनाभ बेहेरा यांनी दिले आहेत.