विनाकारण फिरणाऱ्यांना दंडूक्याची भाषा समजते
कोपरगाव : कोपरगाव शहरात करोना विषाणूजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशावर व राज्यावर आलेले हे महासंकट टाळण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एकदिवसाची जनता कर्फ्यू जाहीर केला. कोपरगावकारांनी शासनाच्या आदेशाला शंभर टक्के प्रतिसाद देऊन स्वताःला कोंडून घेत शिस्तेचे पालन केले. पण दुसऱ्या दिवशी काही रिकामटेकड्या महाभागांनी विनाकारण रस्त्यावर, चौका-चौकात घोळक्याने बसून गर्दी करुन शासनाच्या १४४ या कलमाचे उल्लंघन केले. तर काही नागरीक विनाकारण मोटारसायकलवर शहरात फिरत असल्याने पोलीस व महसुल विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर म्हणाले की, विनाकारण फिरणाऱ्या टुकारांना दंडूक्याची भाषा समजते. सकाळपासुन शहरातील सर्वच रस्त्यावर मोठी वर्दळ होती. अखेर पोलिसांची भाषा सुरू केल्यानंतर नागरीकांनी घरचा रस्ता धरला. शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी गस्त घालून नागरीकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करीत होते. तर तहसीलदार योगेश चंद्रे हे आपल्या पथकासह स्वतः उन्हामध्ये फिरुन जनतेला गर्दी कमी करण्याचे व शासकीय नियमाचे स्वता:साठी पालन करण्याचे आवाहन करीत होते. करोनाची लागन झाली तर त्यात नागरीकांच्या जीवाला धोका आहे हे वारंवार सांगूनही नागरीकांनी करोनाच्या धोक्याकडे अर्थात या महामारीकडे दुर्लक्ष करून मरणाला कवटाळण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशीच शंका यावरून दिसुन येते.
चौका-चौकात ठळक दिसणारे प्रबोधन फलक लावले आहेत. प्रसारमाध्यमातून जनजागृती वारंवार केले जात आहे. कायद्याचा धाक दाखवला तरी नागरीक करोनाच्या संकटाला समजून घेतले नसावे म्हणुनच नागरीक गर्दीत रिकामे फिरत आहे.
दरम्यान राज्यात १४४ कलम लागू केले आहे. नागरीकांनी यापुढे शासनाच्या कायद्याचे पालन केले नाही, कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरले, चारपेक्षा जास्त लोक एकत्र असल्यास तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच फळे, भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर बसुन विक्री करु नये. त्यांनी रस्त्यावरून गल्लीत फिरुन विक्री करावी अन्यथा त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.
तहसीलदार चंद्रे यांनी सोमवारी शहरातील रस्त्याच्या कडेला फळे विक्री करणाऱ्यांना हुसकावून लावले आहे. तर पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी मुख्य रस्त्यावर पोलीस पथकासह उभे राहुन विनाकारण फिरणाऱ्या अनेकांना पोलीसी प्रसाद देऊन होणारी गर्दी कमी केली. पण नागरीकांना करोनापेक्षा पोलिसांची भिती जास्त आहे. त्यांना सौजन्याची भाषा कमी कळत असावी म्हणूनच घरात बसत नसावेत असे म्हणण्याची वेळ आली आहे.