मुंबई – चीनहून कराचीला जाणारे जहाज भारताने मुंबईतील न्हावा शेवा बंदरात रोखले आहे. भारतीय सीमाशुल्क अधिकाऱ्यांना संशय आहे की, या जहाजातील साहित्य पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरू शकते.
चीनमधून येणाऱ्या मालामध्ये, माल पाठवणाऱ्याचे नाव शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेड असे नमूद करण्यात आले आहे आणि सियालकोटमधील पाकिस्तान विंग्ज प्रायव्हेट लिमिटेड असे माल स्वीकारणाऱ्याचे नाव सांगण्यात आले आहे. तथापि, सुरक्षा एजन्सींच्या तपासात जहाजात तब्बल २२,१८० किलोंचे साहित्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनमधून पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या दुहेरी वापराच्या लष्करी दर्जाच्या वस्तू भारतीय बंदर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची ही पहिलीच घटना नाही. चीन, इटली आणि तुर्कस्तानमधून पाकिस्तानी संरक्षण संस्थांना अशी शिपमेंट पाठवली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.