नवी दिल्ली – इंडिया आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच हा प्रस्ताव अधिकृतपणे दाखल केला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स(इंडिया)च्या घटक पक्षांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.
पंतप्रधानांनी संसदेत मणिपुरच्या विषयावर विस्तृत निवेदन करावे अशी मागणी विरोधकांकडून सुरू असली तरी त्याला अजून पंतप्रधानांनी दाद दिलेली नाही.
पंतप्रधानांना बोलणे भाग पाडण्यासाठी अविश्वास प्रस्तावाचा मार्ग स्वीकारावा अशी सुचना पुढे आली आहे. एकदा हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यानंतर संसदेत त्यावर सविस्तर चर्चा होणे आणि त्याला पंतप्रधानांनी उत्तर देणे या बाबी क्रमप्राप्त असतात म्हणून ही रणनिती अवलंबण्याचे विरोधकांनी ठरवले आहे.
सरकारला या विषयावर चर्चा सुरू करण्यास भाग पाडण्याचा हा एक प्रभावी मार्ग असेल,असे मत बहुतेक नेत्यांनी व्यक्त केले. मणिपूरवर सरकारला कोंडीत पकडण्याची विरोधकांची रणनीती राज्यसभेतही सुरूच राहील,असे सूत्रांनी सांगितले.