राहाता – शहरातील स्मशानभूमीत एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होता आले याचा मनस्वी आनंद होत आहे, असे मनोगत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी व्यक्त केले.
शहरात स्मशानभूमीत एक अनोखा आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न झाला. येथील स्मशानभूमीत राहणारे गायकवाड कुटुंबाने आपल्या मुलीचा शुभविवाह स्मशानभूमीतच मोठ्या थाटामाटात केला. शहराच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा हे त्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले. या वेळी दशरथ तुपे, किरण बावळे, कुणाल काळे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पिपाडा म्हणाल्या की, लग्न म्हटले की शुभकार्य. हे शुभकार्य करताना मंगल कार्यालय, लॉन्स किंवा कुठेतरी शेतात मंडप टाकून शुभ विवाह पार पाडतात. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला लोक येतात; परंतु गायकवाड व जयस्वाल कुटुंबाने मयुरी व मनोज यांचा विवाह स्मशानभूमीत करण्याचे ठरविले आणि ते पारही पाडले. अशा या अनोख्या व आगळ्या वेगळ्या शुभकार्यास आम्हाला उपस्थित राहून शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे मी आमचे भाग्य समजते.
आजच्या या आधुनिक युगात स्मशानभूमीत राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मोठे जिकिरीचे असते.
त्यातच राहाता येथील स्मशानभूमीत राहणाऱ्या एका कुटुंबाने स्मशानभूमीतच आपल्या मुलीचा विवाह सोहळा पार पाडला. या गायकवाड कुटुंबाला 2003मध्ये नगराध्यक्षा असताना संभाजीनगर जिल्ह्यातून प्रथम आम्हीच राहाता शहरात आणून या कुटुंबाला घर बांधून दिले. या कुटुंबातील मुलाने एमएस्सीपर्यंतचे शिक्षण याच स्मशानभूमीत पूर्ण केले. या कुटुंबाच्या शुभविवाहात नूतनीकरण झालेल्या देखण्या स्मशानभूमीने चार चांद लगावले यात काही शंकाच नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केली.