नवी दिल्ली – शेतमजुरांचा मसीहा अशी ओळख बनलेले शेतकरी पप्पनसिंह गहलोत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ह्रदय हेलावून टाकणारी ती घटना दिल्लीलगतच्या गावात घडली. करोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात पप्पन यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या शेतमजुरांना विमानाने बिहारमधील मूळगावी पाठवले होते.
पप्पन दररोज त्यांच्या घरासमोरील मंदिरात दर्शनासाठी जायचे. त्या मंदिरात मंगळवारी सायंकाळी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी 55 वर्षीय पप्पन यांनी लिहिलेली चिठ्ठीही आढळली. आरोग्याच्या कारणास्तव जीवनयात्रा संपवत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. पप्पन यांनी आत्महत्या केल्याच्या बातमीने संपूर्ण परिसर हळहळला.
पप्पन हे मशरूमचे उत्पादन करत होते. त्यांच्याकडे बिहारमधील 10 शेतमजूर कामाला होते. लॉकडाऊनच्या काळात त्या शेतमजुरांच्या मूळगावी परतण्याच्या मार्गात अडथळे आले. अखेरीस पप्पन यांनी 68 हजार रूपये खर्चून शेतमजुरांच्या विमान प्रवासाची व्यवस्था केली. पप्पन यांनी शेतमजुरांसाठी विमानाची रिटर्न तिकिटेही बुक केली. त्या औदार्यामुळे पप्पन यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.