एकदा एका सत्पुरूष महाराजांकडे एक गृहस्थ तक्रार घेऊन आले. “”काय झालं?” महाराजांनी त्यांची चिंतीत मुद्रा पाहून विचारले. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, “”काय सांगू महाराज, अहो मुलगा जरा म्हणून अभ्यास करत नाही, सारखा इकडे तिकडे करतो, टंगळ मंगळ करतो. खूप सांगून समजावून पाहिलं, धाकही दाखवला, पण त्याच्यात काही फरक होत नाही. काय करू?”
त्यावर एकदा त्या व्यक्तीकडे आपल्या दिव्यदृष्टीने नीट पारखून, बघत महाराज म्हणाले, “”त्याचं काय आहे, तुमचा मुलगा अभ्यास करत नाही. कारण तुम्ही अभ्यास करत नाही. सांगा ना तुम्ही अभ्यास करता का?”
झालं, तो तसला प्रश्न ऐकला आणि त्या गृहस्थांना काय बोलायचे, काय उत्तर द्यायचे हेच कळेना. ते अचानक गप्प झाले, निरुत्तर झाले. तेव्हा त्यांना समजावीत महाराज म्हणाले, “”अहो, त्याचं काय आहे मुलं ही अनुकरणीय असतात. ती तुमच्या आमच्या सारख्या मोठ्या माणसांकडे पाहून त्यांच्याच आचरणाचे, कृतीचे अनुकरण करत असतात.
हे पाहा जसा मुलांनी त्यांचा अभ्यास करायला हवा तसा आपणसुद्धा आपला अभ्यास करायला हवा. संसार प्रपंच्यातलं पोट भरायचं पुस्तकी ज्ञान हे मिळवण्यासाठी जसा शालेय अभ्यास करावा लागतो तसाच परमार्थात आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूंनी दिलेला, संतांनी दाखवलेला भक्तीचा, जपाचा, तपाचा, साधनेचा, चिंतनाचा अभ्यास हा करावाच लागतो. दोन्ही कडच्या गोष्टी या अभ्यासाशिवाय साध्य होत नाहीत.
आपण मोठी माणसंच जर आपल्याच अभ्यासात टंगळ मंगळ करत असू, तर मुले अभ्यासात लक्ष देत नसतील, वेळच्या वेळी वाचन, मनन, चिंतन करत नसतील तर त्यांना कोणी रागवायचं? मुलांचे कोणी कान धरायचे? असं करा. आधी तुम्ही अभ्यासाचा परिपाठ मुलांच्या समोर घालून द्या. त्यानुसार आचरण करा आणि मग बघा काय होते ते.”
ती व्यक्ती महाराजांना नमस्कार करून निघून गेली. मुलाची तक्रार घेऊन आलेल्या वडिलांनाच ती तशी महाराजांकडून “अभ्यास कर’ अशी शिकवण मिळाली. विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी स्वत: आपला नित्योपासनेचा अभ्यास हा घरात आणि तोही त्या मुलांच्या समोर आणि सातत्याने चालू केला तेव्हा एक दिवस त्यांनी आपल्याच मुलास काही तरी करण्यासाठी हाक मारली तेव्हा मुलाने उत्तर दिले, “”बाबा, मी आता अभ्यास करतोय.”