मुंबई – सरकार पाडले नसते, तर आज तुम्हाला इकडे आंदोलनासाठी यावे लागले नसते. तुमची सेवा ज्यांना कळत नाही ना, ते कृतघ्न लोक आहेत. नुसत्या जाहिराती बघायच्या. गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आणि सुदृढ भारत. गुटगुटीत मंत्री म्हणजे महाराष्ट्र सुदृढ नाही. आरोग्य मंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन. पण, खऱ्या भारताला सुदृढ करण्याचे काम तुम्ही करता. परंतू आत्ताच्या सरकारपेक्षा तो खेकडा बरा अशी आता स्थिती आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यांनी बुधवारी सरकारवर डागले. ते अंगणवाडी सेविकांना संबोधित करताना बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले, मी भाऊ म्हणून आंदोलनात सहभागी होत आहे. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य अशी बिरुदे लावू शकू, अशी माणसे उरली नाहीत. तुम्ही सर्व सावीत्रीच्या लेकी आहात. असंख्य ज्योती एकत्र येतात. तेव्हा त्याची मशाल तयार होते. हे मशाल सत्ता खाली खेचण्यासाठी तयार असते, सेवा करणारे हात जार एकमेकांवर आपटले तर एवढा आवाज येतो. जर हे हात सरकारच्या कानाखाली आपटले तर केवढा मोठा आवाज येईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
डिसेंबरपासून तुमचा लढा सुरू आहे. सरकार तुमचे काही ऐकत का? असा प्रश्न त्यांनी केला. आंदोलन पेटले की मंत्री येतात. पुढच्या अधिवेशनात विषय मार्गी लावू असं म्हणतात. अरे पण तू पुढच्या अधिवेशनात मंत्री म्हणून राहशील का? तुझे सगळे दिल्लीतून चालते अशी टीका उद्धव यांनी केली आहे.
जाहिरात करायला आलो नाही
मी येथे जाहिरात करायला आलेलो नाही. फडणवीसांना म्हटले होते..केसालाधक्का लागला तरी सरकार पाडून टाकेन सरकारकडे आपली जाहिरात करण्यासाठी पैसा आहे. पण राज्यात तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा कर्मचारी ताईंना त्यांना मेहनतीचे पैसे द्यायला निधी नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.