“पुणे तिथे काय उणे’ हे शब्द केवळ एखाद्या क्षेत्रापुरते सीमित नसून सर्वच क्षेत्रांना लागू आहेत. त्यामुळेच उद्योगांपासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत आणि शिक्षणापासून आर्थिक क्षेत्रापर्यंत पुण्याची चौफेर प्रगती झाल्याचे दिसून येते. या प्रवासात मोलाचा वाटा उचलणारे महनीय पुणेकर या प्रगतीचे मानकरी आहेत. काहींचा जन्मच पुण्यात झाला तर काही इतर शहरांतून, इतर राज्यांतून, इतर देशांतून पुण्यात येऊन स्थायिक झाले. विविध क्षेत्रांमध्ये आपल्या प्रतिभेचा आणि क्षमतेचा आविष्कार घडविणाऱ्या अशा पुणेकरांसंबंधी…
राधिका बिवलकर
पुण्याच्या आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. आपल्या असामान्य कर्तृत्वाने त्यांनी पुण्याचा लौकिक वाढविला. शेकडो वर्षांपासून पुण्याच्या अनेक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. अशा व्यक्ती आपल्याला पुण्याच्या इतिहासात तर आढळतातच; परंतु आधुनिक काळातही अनेक मान्यवरांनी उत्तुंग कर्तृत्व गाजवून आपले आणि पुण्याचे नाव जगाच्या पाठीवर उज्ज्वल केले आहे. विविध क्षेत्रांतील अशा महनीय व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेताना महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी या नात्याने या क्षेत्रातील नावे आपसूकच सर्वांत आधी डोळ्यांसमोर येतात. विज्ञानशोधांच्या, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशपातळीवर आपला ठसा उमटवणाऱ्या डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर या सर्वांची माती पुण्याची आहे हे सांगताना प्रत्येक पुणेकराचा ऊर अभिमानाने भरुन येतो. पर्यावरण हा आजच्या काळात सर्वांत कळीचा मुद्दा बनला आहे. जैवविविधतेची समृद्धता विकासाच्या वरवंट्याखाली धोक्यात येत आहे. अशा वेळी शासनकर्त्यांचे कान उपटण्याचे काम करणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांची आज गरज आहे. याबाबतीतही पुणे सरस आहे. पश्चिम घाट संरक्षणाविषयीचा अहवाल देणारे डॉ. माधव गाडगीळ असोत किंवा अंकुर पटवर्धन यांसारख्या नावांखेरीज अनेक नावे या क्षेत्रात आज आपापले योगदान देत आहेत.
नाटक, चित्रपट, संगीत आदी क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या पुणेकरांमध्ये अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे. पुण्यात जन्माला येऊन समृद्ध बालपण व्यतीत करताना डॉक्टर बनण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. परंतु वैद्यकीय शाखेसाठी पुरेसे गुण न मिळाल्याने त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. रसायनशास्त्राची पदवी घेतल्यानंतर दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेत (एनएसडी) प्रवेश घेतल्यापासून त्यांचा अभिनयाच्या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. या क्षेत्रातील उत्तुंग उंची गाठल्यानंतरही अरण्येश्वर आणि पर्वतीच्या सहलींपासून पुण्यात केलेली धमाल त्या विसरल्या नाहीत. अभिनयाच्या क्षेत्रातील दुसरे ठळक व्यक्तिमत्त्व म्हणजे विक्रम गोखले. आत्यंतिक गरिबीत बालपण व्यतीत करताना त्यांनी वर्तमानपत्रे आणि डबे पोहोचवण्यापासून अनेक कामे केली. सदाशिव पेठेतील महापालिकेची शाळा क्र. 4 आणि जिमखाना पोस्ट ऑफिस शाळा क्र. 13 मधून त्यांनी शिक्षण घेतले. वडील अभिनयाच्या क्षेत्रात असले तरी त्यावेळी या क्षेत्रात एवढा पैसा नव्हता. बी. ए.च्या दुसऱ्या वर्षात असताना कॉलेज सोडून आपल्या शिक्षणावर अधिक खर्च करू नये, असे त्यांनी वडिलांना सांगितले. व्हल्कन लावल कंपनीत अवघ्या आठवडाभर नोकरी केल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आर्थिक कारणामुळे अभिनय सोडून शेती आणि नंतर पुन्हा अभिनय असा चढउतारांचा प्रवास अनुभवून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचे अढळस्थान निर्माण केले. चित्रपटांप्रमाणेच नाटकाच्या क्षेत्रातही पुणेकर आघाडीवर राहिले. डॉ. मोहन आगाशे हे त्यातील एक प्रमुख नाव.
मानसोपचारतज्ज्ञ आणि अभिनेते म्हणून ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच; परंतु त्याही पलीकडे माणूसकीचा अखंड झरा म्हणून ते अनेकांना परिचित आहेत. पुण्यात सातत्याने होत असलेले बदल पाहून आपण आपल्याच शहरात राहूनसुद्धा परदेशात राहत असल्यासारखे वाटते, असे म्हणणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांची सर्वांत गाजलेली भूमिका म्हणजे “घाशीराम कोतवाल’ नाटकातील नाना फडणवीस. अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या डॉ. आगाशे यांचे रंगभूमीवरील प्रेम सर्वांना ठाऊक आहे. आजही ते रंगभूमीवर पूर्वीच्याच उत्साहाने कार्यरत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पुण्याचीच. या शहरातून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा आपल्याला अधिकाधिक चांगले काम करण्याची ऊर्जा देतो, असे ती म्हणते. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे या दिग्दर्शक द्वयीचा उल्लेख येथे अत्यंत आवश्यक आहे. सुकथनकर यांचा जन्म कऱ्हाडचा तर भावे यांचा जन्म पुण्यातला. दिग्दर्शनात दोघांनी एकत्रितपणे काम करून उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीचा आदर्श त्यांनी उभा केला आहे. वास्तुपुरुष, दोघी, देवराई, दहावी फ, कासव हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
अनेक क्षेत्रांमध्ये खडतर वाटचाल धडाडीने करून पद्म पुरस्कार पटकावणारे अनेक पुणेकर आहेत. पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे (पीबीएमए) अध्यक्ष पद्मश्री निरंजन पंड्या हे त्यापैकी एक. 4 ऑगस्ट 1945 मध्ये जन्मलेल्या पंड्या यांनी लहानपणीच अपघातात दृष्टी गमावली. समाजशास्त्रात बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम त्यांनी जर्मनीत जाऊन पूर्ण केला. परतल्यावर पीबीएमएचे ते सदस्य झाले. एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, कांतलक्ष्मी आय हॉस्पिटल, अंधांसाठी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, वयोवृद्ध अंध महिलांचे वसतिगृह असे दहा प्रकल्प ते राबवितात. सिंबायोसिसचे संस्थापक एस. बी. मुजुमदार यांना पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण सन्मान बहाल करण्यात आला. उच्चशिक्षणासाठी पुण्यात आलेल्या मुजूमदार यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. दिवाळीच्या सुटीत मुलांच्या वसतिगृहातील एका खोलीच्या खिडकीतून एक मुलगी आतील मुलाला काहीतरी देण्यासाठी रोज येते, हे त्यांनी पाहिले. चौकशी केली असता त्या खोलीतील परदेशी विद्यार्थ्याला कावीळ झाल्याचे त्यांना समजले. त्याची बहीण रोज त्याला जेवण देण्यासाठी येत होती. त्याच्याकडे लक्ष देणारेही कुणी नव्हते. या घटनेमुळे व्यथित झालेल्या मुजुमदार यांनी विद्येच्या माहेरघरात परदेशी विद्यार्थ्यांचे स्वागत करणारी संस्था सुरू केली.
पद्मश्री लीला पूनावाला हे नाव माहीत नसलेली व्यक्ती पुण्यात आढळणार नाही. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. वयाच्या तिसऱ्या वर्षीच वडिलांचे रेल्वे अपघातात निधन झाले होते. त्यांच्या विम्याच्या रकमेवरील व्याज हाच या मोठ्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. आई पापड आणि लोणची तयार करून विक्री करीत असे. शिष्यवृत्तीवरच त्यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले. पुण्यातील त्या पहिल्या महिला मेकॅनिकल इंजिनिअर होत. व्यावसायिक यश हेच सबकुछ न मानता त्यांनी समाजकार्य सुरू केले. 1996 मध्ये लीला पूनावाला फाउंडेशनची स्थापना झाली आणि वीस मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. तेव्हापासून सुमारे तीन हजार मुलींना त्यांनी शिक्षणासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली आहे. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनाही पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लहानपणापासूनच निसर्गाची आवड असलेल्या माधव गाडगीळ यांनी देशी आणि परदेशी शिक्षणसंस्थांमध्ये केलेले अध्यापनाचे काम, संशोधन आणि पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ समितीचे प्रमुख या नात्याने दिलेला परखड अहवाल ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. अनेक नैसर्गिक आपत्तींची कारणे आणि निसर्गात ढवळाढवळ केल्याचे परिणाम बेधडकपणे सांगताना त्यांनी कधीच बोटचेपे धोरण अवलंबिले नाही.
क्रीडा क्षेत्रातही पुणेकर कधीच मागे राहिले नाहीत. नेमबाजीत आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करणाऱ्या अंजली भागवतला लहानपणापासूनच क्रीडाक्षेत्राची आवड होती. कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचे तेच प्रमुख कारण होते. एनसीसीचे प्रशिक्षण घेताना तिने बंदूक प्रथम हाताळली. नेमबाजीत तिला फारसा रस वाटला नाही; परंतु बदली खेळाडू म्हणून तिला नेमबाजीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे लागले आणि ती विजेती ठरली. मग मात्र तिने मागे वळून पाहिले नाही. संजय चक्रवर्ती यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन तिने ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेसह देशविदेशातील अनेक स्पर्धा गाजविल्या. बिलिअर्डस आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवानी लहानपणापासून टेबलटेनिस खेळत असे. घराशेजारी असलेल्या स्नूकर क्लबमध्ये सराव करता-करता तो जागतिक कीर्तीचा स्नूकरपटू बनला. जागतिक विजेतेपद तब्बल 13 वेळा जिंकणाऱ्या पंकजला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात असे अनेक खेळाडू पुण्याच्या भूमीने दिले आहेत.
सामाजिक कार्याच्या क्षेत्रात सिंधुताई सपकाळ हे नाव सर्वपरिचित आहे. अत्यंत हालाखीच्या जगण्यातून त्यांनी केवळ आपलाच विचार न करता आपल्यासारख्या अनेक स्त्रियांचा विचार केला. अनेक असहाय महिलांना त्यांनी आधार दिला. उत्कट प्रेम हाच ज्यांचा स्थायीभाव आहे, त्या सिंधुताईंना संपूर्ण महाराष्ट्र आईफ म्हणूनच ओळखतो. संगीताच्या क्षेत्रात गायिका बेला शेंडे यांनी लौकिक मिळविला आहे. वयाच्या सातव्या वर्षी जेव्हा मुले खेळण्या-बागडण्यात रममाण होतात, तेव्हापासून संगीताचे धडे घेणाऱ्या बेला शेंडे यांना पुणेकरांसमोर मैफल सादर करणे नेहमीच आवडते. आवडनिवड स्पष्टपणे सांगणारे पुणेकर रसिक सर्वाधिक प्रामाणिक आहेत, असे त्या सांगतात. संगीतकार अजय-अतुल यांनी मराठी आणि नंतर हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात जे स्थान निर्माण केले आहे, त्याला तोड नाही.