लंडन – भारतीय संघ गुरुवारी(दि.14) यजमान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा त्यांना या सामन्यासह मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 10 गडी राखून जिंकत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सातत्याने अपयशी ठरत असला तरीही त्याला एका अनोख्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मिळून एकूण 101 धावा केल्या तर तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरणार आहे.
या कामगिरीत सध्या भारतीय संघाचा सध्याचा मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू राहुल द्रविड अव्वल स्थानी आहे. त्याने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध 20 एकदिवसीय सामन्यांत 648 धावा केल्या आहेत. कोहलीच्या 14 सामन्यांतून 548 धावा झाल्या असून त्याला द्रविडला मागे टाकण्यासाठी 101 धावांची गरज आहे.
दरम्यान, स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या सामन्याला मुकला होता. मात्र, आता उर्वरित दोन सामन्यांत तो खेळू शकेल का, याबाबत अद्याप बीसीसीआयने काहीही सांगितलेले नाही. त्याचा वैद्यकीय अहवाल आल्यावरच याबाबत माहिती दिली जाणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.