नवी दिल्ली – भारतामध्ये वेगाने रस्ते उभारणी होत आहे. रस्ते आणि तर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासत आहे. आता केंद्र सरकार या पायाभूत सुविधा विकासासाठी शेअर बाजारातून भांडवल उभारणार असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
जागतिक पातळीवर मंदी असल्यामुळे भांडवल उभारणी होईल की नाही अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र भारतातील पायाभूत सुविधांसाठी भांडवलाची कसलीही चणचण भासणार नसल्याचा दावा गडकरी यांनी केला. सध्या आमच्यासमोर भांडवलाचा कसलाही प्रश्न नसला तरी आम्ही शेअर बाजारातून भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
आम्हाला श्रीमंत लोकांचे पैसे नको आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांचे पैसे भांडवल बाजाराच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. शेअर बाजारातून आपण सर्वसामान्य लोकांकडून निश्चितपणे भांडवल उभारणीत यशस्वी होऊ. या लोकांनी काही हजारात किंवा लाखात रक्कम दिली तरी आम्ही त्यांना कमीत कमी आठ टक्के दराने परतावा देऊ असे गडकरी यांनी सांगितले.
ते म्हणाले की भारतात बांधकाम उपकरण उद्योग 50 हजार कोटीचा आहे. मात्र कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे या क्षेत्रासमोर काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे आम्ही डिझेलचा वापर कमीत कमी करण्याच्या शक्यतावर भर देणार आहोत. सरकारचा पर्यायी इंधन स्त्रोत विकसित करण्यावर भर असल्याच्या मताचा त्यांनी पुनरुच्चार केला.
भारतामध्ये भारतीयांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक वाहनाची उत्पादन आणि विक्री वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या क्षेत्रात परकीय कंपन्या मागे पडत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताकडे मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध असूनही सध्या कोळशाची आयात करावी लागत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कोळशाच्या 60% खानीचे खासगीकरण करण्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे त्यावरील अधिभार कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये रस्ते विकासाला भांडवल कमी पडेल का असे विचारले असता आपल्याला तसे वाटत नाही, अर्थ मंत्रालय यात लक्ष घालील असे ते म्हणाले. रस्त्यावरील सुरक्षा वाढविण्यासाठी अनेक पातळ्यावर उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.