सातारा – आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांच्य विरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे सातारा शहर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप जगताप यांच्याकडे करण्यात आली.
याविषयी लेखी तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, प्रभू श्रीराम हे समस्त भारतवासी यांचे आणि हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत. माता, पिता यांचा शब्द प्रमाण मानून अखंड चौदा वर्षे सश्रम वनवास व्यथित करून ज्यांनी जीवनाचा आदर्श निर्माण केला. अशा प्रभू श्रीरामाबद्दल प्रत्येक हिंदू धर्माच्या मनात अत्यंत आदर व सन्मानाचा श्रद्धेचा भाव आहे.
अशा जीवनाचा आदर्श प्रमाण म्हणून सिद्ध असणाऱ्या देवाधिकांचे नाव एकेरी शब्दात घेऊन त्यांनी वनवासी जीवन जगत असताना शिकार करून मांसाहार केला वगैरे अक्षम्य विधाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहेत.
लोकप्रतिनिधीने केलेले विधान हे जाणीवपूर्वक व पूर्ण विचारांती समाजामध्ये द्वेष, जातीय तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने केलेले आहे अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या अनुषंगाने आयपीसी कलम 294 504 506 अन्वये सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, आशाताई पंडित, धनंजय जांभळे, युवा मोर्चाचे अमोल कांबळे, अनिता बोड्स, पंचायत राज आघाडीचे चेतन घाटगे, माजी नगरसेवक किशोर पंडित, चैतन्य बोडस, अमोल टंकसाळे चित्रपट कामगार आघाडी चे विकास बनकर, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.