बालोद – छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. स्पोर्टस युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) ट्रकला धडकून झालेल्या अपघातात पाच महिला आणि दोन मुलांसह अकरा जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, सर्व अपघातग्रस्त महिला धमतरी जिल्ह्यातील सोराम-भटगाव गावातील रहिवासी असून त्या एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होत्या. पुरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगतारा गावाजवळ बुधवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग-30 वर हा अपघात झाला.
पुरूर पोलिसांनी सांगितले की, या सर्व महिला कांकेर जिल्ह्यातील मरकटोला गावात लग्न समारंभासाठी जात असताना त्यांच्या वाहनाची ट्रकला धडक बसली. महिंद्रा बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ट्रक चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जो आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पळून गेला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.