राजस्तानातील प्रकार
कोटा – राजस्तानात वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 25 जण ठार झाले आहेत. ही घटना बुंदी जिल्ह्यात आज सकाळी कोटा-दौसा मार्गावर घडली. ही बस 28 वऱ्हाडी मंडळींना घेऊन सवाई माधवपुरकडे चालली होती. त्यावेळी पापडी गावाजवळील एका नदीवरील पुल ओलांडत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती सरळ नदीच्या पात्रात कोसळली.
या पुलाला कठडे नव्हते त्यामुळे बस थेट नदीच्या पात्रात पडली. बस वेगात होती. त्यामुळे चालकाला ती आवरणे शक्य झाले नाही असे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत 13 जण जागीच ठार झाले तर अन्य लोक रूग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावले. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले आहे. जखमीं लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.