आळंदी,(वार्ताहर) – वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी वरील प्रदुषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
इंद्रायणी नदीच्या प्रदुषणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता आळंदीकरांची या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणापासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) वारकरी शिक्षण संस्थेच्या बंकटस्वामी सदन या विद्यार्थी वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मागील काही महिन्यांत इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न नागरिकांनी सरकार दरबारी अनेकदा मांडला होता. मात्र यावर कोणतीही करवाई होताना दिसली नाही अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले मात्र प्रदुषणाचे प्रमाण वाढतानाच दिसत आहे. संपूर्ण नदी फेसाळलेली दिसते. या नदीच्या प्रदुषणामुळे आळंदीतील हजारो नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे अनेकदा नागरिकांनी बोलून दाखवले आहे.
तरी प्रदुषण कमी होईना
आषाढी वारी, कार्तिकी एकादशी अशा प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. पण आता वारकरी अन् स्थानिकांना या पाण्यामुळे आजार जडत आहेत. गेल्या सात वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. त्यांनी काही कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र प्रदूषण कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता थेट देवेंद्र फडणवीसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे प्रदूषण दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे