वनविभागातील अडथळ्यांच्या शर्यती पार करीत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत वनपरिक्षेत्र अधिकारीपदी काम करणाऱ्या जयश्री जगताप यांनी अल्पवधीत लौकीक मिळविला आहे. प्रशासकीय कामकाजात सूसुत्रता, कर्मचाऱ्यांशी सूचना, मार्गदर्शन करीत त्यांनी गेल्या तीन वर्षांत वनविभागाचा कारभार लोकाभिमुख केला आहे. अनेक अवैध व्यवसायावर कारवाई करून त्यांनी शासनाच्या तिजोरीत महसूल जमा केला आहे. सासूरवाशिण असलेल्या जगताप यांनी तालुक्यातील कामकाजात लोकसहभाग वाढविला आहे.
सासवड प्रादेशिक वन विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून रणरागिणी जगताप-जाधव यांनी पारदर्शकता आणली आहे. वनविभागातील अनेक बेकायदेशीर प्रकारांना आळा घातला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक कारवाई झाल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत महसूल जमा झाला आहे.
जयश्री वामन जाधव यांचे जन्म गुळुंब (ता. वाई, जि. सातारा) येथे दि. 20 एप्रिल 1987 रोजी झाला. त्यांचे वडील मुंबई बीएसटीमध्ये सेवा बजावत होते. जयश्री जाधव यांचे शिक्षण एम एस सी ऍग्रीपर्यंत झाले. त्यांचा विवाह माहूर (ता. पुरंदर) येथील जितेंद्र वसंत जगताप यांच्याशी झाला.
त्यांची 2013 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी वर्ग 2 (राजपत्रित) पदी निवड झाली. फेब्रुवारी 2014 ते ऑगस्ट 2015 मध्ये वनप्रशिक्षण अकादमी (कुंडल, जि. सांगली) येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचे 2015 मध्ये वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण (जि. नांदेड) येथे नेमणूक करण्यात आली. मे 2017 मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सासवड येथे त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्यासमोर आव्हान होते. त्यांच्यादृष्टीने पुरंदर तालुका नवीन नव्हता. तरी तालुक्यामध्ये कार्य बजावत असताना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
जगताप यांनी अवैद्य लाकूड साठा करणाऱ्या आरागिरणीवर कारवाई करून दंड वसूल केला. 4 कोटी व 13 कोटी वृक्ष लागवडीतंर्गत लागवड करण्यात आली. वाघडोंगर, बोपगाव, भुलेश्वर, जेजुरी येथील वन पर्यटनाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. जलयुक्त व जलशक्ती अभियानअंतर्गत मृद व जलसंधारणाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.
वृक्ष संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती, वन्य प्राण्यांमुळे पीक नुकसान व पशुधन नुकसानीबाबत लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिली आहे. कारवाई केल्या आहेत. 2008 मध्ये चिंकारा हरीण शिकार प्रकरणांमध्ये पाठपुरावा केल्याने सासवड न्यायालयाने निकाल दिला. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. आंबळे येथील सशाच्या शिकार प्रकरणात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. रानमळा येथील लांडग्याच्या शिकार प्रकरणात कारवाईचा बडगा उगारून 2 आरोपींना ताब्यात घेतले.
माहूर येथील सशाच्या शिकारप्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खळद येथील रानडुक्कर शिकार प्रकरणात 3 आरोपींना अटक केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. भिवडी येथे शिकार करण्याच्या उद्देशाने सापळा लावणाऱ्यावर कारवाई केली. वनविभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमणे हटविली आहेत. अवैद्य कोळसा वाहतूक करणारे तीन ट्रक न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारजमा करण्यात आले.
आंबळे येथील रेल्वे दुहेरीकरणाचे काम करणाऱ्या खासगी कंपनीमार्फत केलेल्या अतिक्रमणामुळे संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करून रक्कम वसूल केली. कार्यालयामध्ये सात महिला कार्यरत आहेत. त्यांची त्यांना साथ मिळत आहे.
शब्दांकन : अमोल बनकर, सासवड.