नवी दिल्ली – भारताकडून चर्चेची इच्छा व्यक्त करणारा संदेश आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र, तो दावा खोडून काढत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश केला. त्याशिवाय, लडाखवरून काही-बाही बरळणाऱ्या चीनलाही परत एकदा सुनावले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक सल्लागार मोईद युसूफ यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली. त्यामध्ये त्यांनी चर्चेची इच्छा व्यक्त करणारा संदेश भारताकडून आल्याचे म्हटले. काश्मीरचे तुणतुणेही त्यांनी वाजवले. त्यावर भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया दिली. भारताकडून पाकिस्तानला कुठलाही संदेश पाठवण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीत युसूफ भारताच्या अंतर्गत बाबींविषयी बोलले. पाकिस्तान सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयश आले आहे. त्यावरून पाकिस्तानी जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नेहमीप्रमाणे भारताला मध्ये ओढण्याचा प्रयत्न झाला, अशी खिल्लीही श्रीवास्तव यांनी उडवली.
लडाखला केंद्रशासित प्रदेश आणि अरूणाचल प्रदेशला राज्य मानत नाही, असे वक्तव्य अलिकडेच चीनकडून करण्यात आले. त्यावरून श्रीवास्तव यांनी चीनला फटकारले. जम्मू-काश्मीर, लडाख आणि अरूणाचल हे भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि कायम राहतील. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये बोलण्याचा चीनला कुठलाही अधिकार नाही, या भूमिकेचा त्यांनी पुनरूच्चार केला.