पेइचिंग- आपल्या वन चायना पॉलिसीनुसार चीन तैवानला आपलाच भाग मानते. मात्र तैवानला ते मान्य नसून त्यांनी कधीच आपल्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले आहे. त्यामुळे तैवानशी जे देश संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर चीन खार खाउन असतो.
तैवानचा आज राष्ट्रीय दिवस आहे. त्यामुळे त्या देशाला त्यांच्या मित्र देशांनी व त्यांच्या सार्वभौमतेचा सन्मान करणाऱ्या देशांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातही दिल्लीतील चीन दूतावासाबाहेर असे शुभेच्छा फलक लागल्यामुळे चीनचे पित्त खवळले आहे. भारताने आगीशी खेळू नये, आणि भारतातील सत्ताधारी पक्षाने मुर्खासारखे वागू नये असे चीन सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून धमकावण्यात आले आहे.
तैवानच्या राष्ट्रीय दिनाचे शुभेच्छा पोस्टर्स लावणे हे आगीशी खेळण्यासारखे आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध अगोदरच बिघडले आहेत. अशा प्रकारांमुळे तणाव आणखी विकोपाला जाईल. सत्ताधारी पक्षाने असा मुर्खपणा करू नये अशी धमकीही ग्लोबल टाइम्सने दिली आहे.
भाजपचे दिल्लीतील नेते तेजिंदर बग्गा यांनी हे पोस्टर चीनच्या दुतावासाबाहेर लावल्याचे बोलले जात असून त्यातून चीनने हा इशारा दिला आहे. त्यातच सोशल मीडियावरही तैवानला भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात असल्यामुळे चीनच्या जळफळाटात भरच पडली आहे.
चीनी तज्ञ लीयू काइयू यांच्या हवाल्याने दिलेल्या ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की भारतीय माध्यमांनी तैवानच्या राष्ट्रीय दिनाचे समर्थन केले आहे व त्याला सहकार्यही केले आहे. तैवानच्या मुदद्यावरून भडकावण्याचा हा प्रयत्न भारत आणि चीनमधील असा प्रभाव टाकेल की भविष्यात पुन्हा संबंधांत सुधारणा होण्याची शक्यता मावळेल.
दरम्यान, शांघाय इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ञ झाओ गाचेंग यांनी म्हटले की भारत चीनला आव्हान देउन आगीशी खेळ करतो आहे. चीनच्या वन चायना धोरणाच्या विरोधात जाउन चीनच्या अंतर्गत विषयावर भावना भडकावून भारत सरकार चीनला एक शेजारी राष्ट्र या भूमिकेतून मागे जाण्यास बाध्य करतो आहे. असेच जर झाले तर परस्पर देवाण घेवाण आणि आर्थिक बाबींत काही गोष्टी गमवाव्या लागल्या तर भारताने तेव्हा आश्चर्य वाटून घेउ नये, असा गर्भित इशाराही झाओ यांनी दिला.
चीनचे आणखी एक कथित तज्ञ हू जिओंग यांनीही या विषयावर गरळ ओकली आहे. त्यांनी भारतातल्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला लक्ष्य केले आहे. भाजप अनैतिक पध्दतीने तैवानचा विषय उपस्थित करतो आहे. तैवान कार्ड खेळून त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. चीनसोबत बार्गेनिंग करायला याचा उपयोग होईल असे त्यांना वाटते आहे. मात्र या भडकावण्याच्या कृतीने भारताचे काही भले होणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली आहे.