चंडीगढ – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील शेतकऱ्यांनी आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्या राज्यातील भाजप नेत्यांच्या घरांबाहेर धरणे धरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्याशिवाय, रेल रोको आंदोलन बेमुदत काळ चालवण्याचा निर्धारही केला आहे.
शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आणि विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपामुळे कृषी कायदे वादग्रस्त ठरले आहेत. त्यावरून प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणात शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. आता त्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी 31 शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी ग्रामसभांच्या माध्यमातून कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मंजूर करण्याचे आवाहन पंजाबमधील ग्रामपंचायतींना केले आहे.
कृषी कायद्यांचा निषेध करत शिरोमणी अकाली दल (एसएडी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडला. ती घडामोड एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भाजपसाठी आणि मोदी सरकारसाठी मोठा हादरा मानली गेली. एनडीएतून बाहेर पडल्यानंतर एसएडीनेही पंजाबमध्ये शेतकरी मोर्चे काढण्याचे ठरवले आहे.