सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील वाकी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे वाकी, चोपडज येथे ओढ्यावर असणाऱ्या पुलावरून पाणी जास्त प्रमाणात वाहू लागल्यानंतर पावसाळ्यात अनेकदा वाहतूक बंद होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा पूल कुचकामी ठरत आहे. यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुलांची उंची वाढविण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
वाकी व चोपडज पुलांची उंची कमी असल्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहतूक बंद होत आहे. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे परिसरातील गावांचा संपर्क तुटला जात आहे. वाकी व चोपडज ओढ्यावरील बंधारा पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. चोपडज पुलाला मध्ये तीन फुटापर्यंत खोल खड्डे पडले आहेत.
त्यात चारचाकी व दुचाकी वाहने पडून अपघात होत आहेत. रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता व साईडपट्टया खचल्या आहेत. यातून एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते. त्याआधी वाकी, चोपडज रस्त्याचे काम पूर्ण करून पुलांची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.