नागपूर- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत आहे. रोज रुग्णाची आकडेवारी नवा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून येत्या शनिवार आणि रविवारी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने खुली राहणार आहे.
नागपूरमध्ये देखील कोरोनाची स्थिती अजून नियंत्रणाबाहेर आहे. आज महापालिकेची बैठक पार पाडली. या बैठकीत महापौर संदीप जोशी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी उपस्थित होते. यावेळी महापौरांनी शनिवार आणि रविवार अशा दोन दिवशी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
महापालिकेच्या बैठकीत लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्यात आली. लॉकडाऊन जाहीर करावा अशी अनेक लोकप्रतिनिधींची मागणी होती. मात्र लॉकडाऊन लावल्यास अडचणी येतील असं आयुक्तांचं मत होतं. शिवाय लॉकडाऊन बाबत निर्णय घेणं राज्य सरकारचा अधिकार आहे, असं महापौरांनी सांगितलं.
शनिवारी रात्री ते सोमवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. बाकीचे निर्णय पुढील बैठकीत घेण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.