नवी दिल्ली – भारत सरकार नियोजनबद्धपणे करोना प्रादुर्भावाचा मुकाबला करीत आहे असे विधान गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते. त्याची राहुल गांधी यांनी ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले आहे की देशाचा जीडीपी शून्याच्या खाली 24 टक्क्यांवर गेला, 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोक मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले आणि करोना प्रसाराचे दैनंदिन प्रमाण आणि मृत्यूचा भारताचा दर जगात सर्वाधिक ठरला, हे सारे त्यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे घडले असा टोमणा राहुल गांधी यांनी मारला आहे.
अमित शहा यांनी गुरूवारी एक वक्तव्य करताना म्हटले होते की, देशापुढे करोनाचे अभुतपूर्व आव्हान निर्माण झाले आहे पण मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार त्याचा नियोजनबद्धपणे मुकाबला करीत आहे. या प्रयत्नांची संपूर्ण जगाने वाखाणणी केली आहे असा दावाही अमित शहा यांनी केला होता, त्याची राहुल गांधी यांनी ट्विटरवर वरील प्रमाणे खिल्ली उडवली आहे.