राजगुरूनगर -खेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे ओढे, नाले, नदी, धरणे आणि विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भीमाशंकर, भोरगिरी परिसरात मुसळधार पाऊस सरू असल्याने भीमानदी, आरळानदी दुथडीभरून वाहत आहे.
भीमा आणि आरळा या दोन्ही नद्यांमधून चास कमान धरणात सुमारे सात ते आठ हजार क्युसेकने पाणी जमा होत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. चास कमान धरण गुरुवारी (दि. 13) सायंकाळी पाचवाजेपर्यंत 40 टक्के भरले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
तर भीमाशंकर परिसरात गेली दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असल्याने भागातील नागरकांमध्ये “कही खुशी कही गम’ आहे. जेव्हा भात लावणी सुरू होती त्यावेळी पावसाने दडी मारली. आता पावसाने मोठी सुरुवात केल्याने याभागात शेतकरी असमाधानी आहे. एकूणच तालुक्यात होणारा पाऊस शेती पिकासाठी आणि बंधारे धरणे, शेततळी भरण्यासाठी उपयोगी झाल्याने तालुक्यातील दुष्काळ हटला आहे.
पाभेतील धोका टळला तरी भीती कायम
मागील वर्षी 27 जुलै रोजी भीमाशंकर परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी पाभे गावातील पूल कम बंधाऱ्याचे ढापे काढले नसल्याने भीमानदीला पूर आल्याने पाण्याचा फुगवटा वाढल्याने पाभे गावात पाणी शिरले होते. मागील वर्षाची पूर परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाने वेळीच येथील पुलाचे ढापे काढल्याने पाभे गावात पाणी शिरण्याचा धोका आता टळला असला तरी अतिवृष्टी झाली तर पाण्याचे संकट गावात कायम आहे.