न्हावरे : राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या माध्यमातून मागील 4 महिन्यांपासून चालू असलेल्या शिरूर तालुक्यातील न्हावरे ते तांदळी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम संबंधित विभागाने थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा रस्त्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र कोरेकर व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दिपक कोकडे यांनी निवेदनाद्वारे आज दिला आहे.
निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, संबंधित मुळ रस्ता हा फक्त साडेपाच मिटरचा आहे.रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूच्या शेतजमिनी आमच्या वडीलोपार्जीत असुन, त्याचा आम्ही शेतकरी नियमित शेतसारा भरून आजतागायत शेती कसत आहे.मात्र, लॉक डाऊनच्या काळात मागील काही दिवसांपासून अचानक या रस्त्याचे संबंधीत विभागाने रूंदीकरणाचे काम चालू केले.
काम चालू करण्यासाठी पूर्वी नियमानुसार लगतच्या जमीनीचे भूसंपादन होऊन संबंधित बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत संबंधीत शेतकऱ्यांना मोबदला मिळणे दूरच साधी शासकीय नियमानुसार आजतागायत नोटीसही प्राप्त झाली नाही. किंवा एखादा शासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीलाही आलेला नाही. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असे असताना रस्त्याचे काम युध्द पातळीवर बिनदिक्कतपणे चालू आहे. रस्त्याचे काम चालू असताना देखभालीसाठी शासकीय किंवा निमशासकीय यंत्रणा येथे उपस्थित नसल्याचे येथील शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे.
सदर रस्त्याचे काम खाजगी ठेकेदार व त्यांचे प्रतिनिधी करून घेत उपस्थित असलेल्या संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे जर शेतकऱ्यांनी शासकीय दस्तऐवजाची मागणी केली तर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जर जास्त खोलात जाऊन माहिती विचारली तर तुझं जास्त क्षेत्र जाईल.अशी दमदाटी केली जाते. असाही अनुभव काही शेतकऱ्यांना आला आहे.काम करतानाही संबंधित यंत्रणेकडून नियमांचे उल्लंघन करून उभ्या पिकाचे नुकसान करून काम केले जात आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळेसच रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यादरम्यान रस्त्यावर येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांची कोणताही खबरदारी घेतली जात नाही. अशी शेतकऱ्यांची व प्रवाशांची तक्रार आहे.
रस्त्याचे काम करणारे ठेकेदार हे राजस्थानचे आहेत. तर शासकीय अधिकारी हे नाशिक,नगरचे आहेत. एकूणच या कामासाठी संबंधित यंत्रणेकडून साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर केला जात असुन, त्यामुळे न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान रस्त्याच्या कामाला या परिसरातील कोणाचाच विरोध नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या कामासाठी वडीलोपार्जीत जमीनी जात आहेत त्यांचे भूसंपादन होऊन त्याबदल्यात संबंधीत शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. त्याचबरोबर यापुढे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे.
जर या गोष्टींचे पालन झाले नाही तर येत्या १५ ऑगस्ट पासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निर्वीचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे यांनी आज दिला.याबाबत राष्ट्रीय महामार्गचे अभियंता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.