नवी दिल्ली: आसाम राज्यासाठी दूरदर्शन आसाम या 24 तास समर्पित वाहिनीचे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. ही वाहिनी आसामच्या लोकांसाठी एक भेट असून ही वाहिनी आसाममधल्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचेल आणि ती खूप लोकप्रिय होईल, असा विश्वास जावडेकरांनी यावेळी व्यक्त केला.
इतर राज्यांच्या वाहिन्या डीडी फ्री डिशवर उपलब्ध आहेत. यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या सहा राष्ट्रीय वाहिन्यांवरील कार्यक्रमांची प्रशंसा केली. ही वाहिनी आसामच्या सर्व क्षेत्रातील विकासाला चालना देईल आणि त्याचवेळी सरकारच्या उपक्रम आणि कार्यक्रमांना तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत करेल, असे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.
प्रसारभारतीची डीडी ईशान्य भारत वाहिनी, ही चोवीस तास चालणारी संमिश्र वाहिनी आठही राज्यांसाठी, 1 नोव्हेंबर 1990 साली सुरू करण्यात आली होती. 27 डिसेंबर 2000 पासून ही वाहिनी 24 तास सुरू करण्यात आली आहे.
सध्याच्या कोविड संकटात, तात्पुरती उपाययोजना म्हणून ईशान्य भारतातील सर्व वाहिन्यांचे अपलिंकिंग केले जात आहे. एप्रिल 2020 पासून डीडी नागालॅंड, डीडी त्रिपुरा, डीडी
मणिपूर, डीडी मेघालय आणि डीडी मिझोराम ह्या वाहिन्या 24 तास वाहिन्यांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या.