मंचर -माळीण प्रमाणेच आंबेगाव तालुक्यातील दरडप्रवण पाच गावांच्या पुनर्वसनासाठी तातडीने प्रस्ताव तयार करा, अशा सूचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या घोडेगाव येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पाच गावांतील जागा मालक, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
माळीणच्या वेळी दरडप्रवण गांवामध्ये भेगा पडणे, जमीन खचणे, दरडी कोळसणे, घरांना पाझर येणे आदी प्रकाराणे माळीण (पसारवाडीतील 25 घरे), मेघोली येथील 15 घरे, जाभोरी – काळवाडी नं. 1 मधील 35 घरे, तर काळवाडी नं. 2 मधील 29 घरे, फुलवडे-भगतवाडी येथील 14 घरे, पोखरी-बेंढारवाडीतील 57 घरे आणि येथील शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, पाण्याच्या टाक्यांसह या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
मागील दोन वर्षांपासून मेघोली आणि जांभोरी (काळवाडी न.1, काळवाडी न. 2) मधील कुटुंबाना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. या वर्षीही पावसाळ्यात पुन्हा करावे लागणार आहे. पुनर्वसनासंदर्भात गावांचा प्रस्ताव युद्धपातळीवर मंजूर करून दिवाळीपर्यंत घरांची कामे सुरू करण्याचा प्रयत्न मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.
पुनर्वसनासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून हे प्रस्ताव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी संबधित गावातील नागरिकांनी केली आहे.