निमसाखर -निमसाखर (ता. इंदापूर) येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोशल डिस्टन्स पाळत कुलूप बंद मंदिराच्या सभागृहातून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेले पालखी सोहळे रद्द करून एसटी बसच्या माध्यमातून पंढरपूरला मानाच्या पालख्या मार्गस्थ झाल्या.
मात्र, या वर्षी वारी झाली नसली तरी भाविकांनी घरातच वारीचा सोहळा साजरा केला आहे. निमसाखर येथील जुनी चावडी भागात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. करोनामुळे मंदिरांना कुलूप लावण्यात आले आहे.
मात्र, तरीही दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली. भाविकांनी बुधवारी (दि. 1) सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त निमसाखर येथील विठ्ठल मंदिराच्या सभागृहातूनच दर्शन घेतले आणि एकादशीचा सोहळा पार पाडला.