मुंबई – करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यानुसार मुंबईतील प्रख्यात लालबागचा राजा या गणेश मंडळाने यंदाचा आपला उत्सव रद्द केला आहे. त्याऐवजी ११ दिवस आरोग्यत्सव साजरा करणार असल्याची माहिती मंडळाने दिली. या निर्णयाचे भाजप नेते आशिष शेलार यांनी स्वागत केले. मात्र, ८७ वर्षांची परंपरा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एकाकी खंडित करु नये, असे आवाहन केले आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आला. पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मुर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार. त्यांचे कौतुकच! तर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”. पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ”, असे त्यांनी म्हंटले आहे.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”..पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ”!
( 2/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 2, 2020
तसेच संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुध्दा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रध्देला मोल नाही. श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही. म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?, असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुध्दा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रध्देला मोल नाही..श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही…म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?
(3/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 2, 2020
दरम्यान, यंदा लालबागच्या राजाची गणेशमूर्ती मंडपात नेहमीप्रमाणे विराजमान केली जाणार नाही. या मंडळाचे सेक्रटरी सुधीर साळवी यांनी ही माहिती दिली. मंडळातर्फे रक्तदान, प्लाझ्मा दान असे उपक्रम सुरू केले जाणार असून करोना विरुद्धच्या लढाईत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीत 25 लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे. चीनशी झालेल्या संघर्षात प्राण गमावलेल्या 20 शहीद जवानांच्या कुटुंबीयांचाही मंडळातर्फे यावेळी सत्कार केला जाणार असल्याचेही मंडळाने सांगितले.