नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे सर्व कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आपले काम आणि पगार टिकवून ठेवण्यासाठी कर्मचारी भ्रष्ट मार्गाचा अवलंब वाढविण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे.
त्यासंदर्भात सर्वेक्षण केले असता कर्मचाऱ्यांची सध्याच्या परिस्थितीत नैतिकतेकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती आढळून आली. कंपन्यांच्या विविध वर्गातील कर्मचाऱ्यांशी यासंदर्भात विचारणा केली असता सध्याच्या परिस्थितीत आपले अस्तित्व टिकविणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे आपण नैतिक मार्गाकडे दुर्लक्ष करू शकतो, असे बऱ्याच कर्मचाऱ्यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. त्यामुळे अशा ठिकाणी स्पर्धेच्या नावाखाली अनैतिक मार्गाचा अवलंब केला जातो. मात्र, लॉकडाऊनमुळे या प्रमाणात वाढ होणार असल्याचे कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता आढळून आले. परस्परादरम्यान अयोग्य व्यवहार करणे, बाहेरच्या पार्टीला खोटी माहिती देणे, लाच देणे-घेणे अशा प्रकारचे व्यवहार काही प्रमाणात वाढू शकतात असे या चर्चेतून आढळून आले.
भारतातील 69 टक्के कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की, त्यांच्या कंपनीचे व्यवस्थापन वित्तीय फायद्यासाठी नैतिकतेचा बळी देऊ शकते. जागतिक पातळीवर हे प्रमाण 32 टक्के आहे. 31 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कोणी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो, तर 29 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बाहेरच्या पार्टीर्शी खोटे बोलून कंत्राट मिळवण्यात काही हरकत नाही. कंपन्यांतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बऱ्याच देशांमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा नियम राबविला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये कंपन्यादरम्यानची स्पर्धा वाढली आहे. त्याचबरोबर कर्मचारी अस्वस्थ आहेत. त्यामुळे या कालावधीत कॉर्पोरेट गव्हर्नंसवर परिणाम होऊ शकतो, असे सर्वेक्षण केलेल्या ई- वाय संस्थेचे वरिष्ठ अधिकारी अरपिंदर सिंग यांनी म्हटले आहे.