– गणेश आंग्रे
पुणे – सरकारी कार्यालयांमध्ये करोना रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये आवश्यक ती खबरदारी आधीपासूनच घेतल्याने येथे प्रादुर्भाव रोखण्यास यश आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. त्यामुळे कर्मचारी व नागरिक यांची तपासणी करूनच प्रवेश दिला जातो. शिवाय, आवश्यक ती खबरदारी घेत आहे.
सरकारी कार्यालयांमधे नेहमी गर्दी असते. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून समन्वयाची जबाबदारी पार पाडण्यात येत आहे.
विविध बैठकांचे आयोजन करणे, प्रवासासाठी पास देणे, मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविणे, परराज्यातून आलेल्या मजुरांची तपासणी, विमानातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइनची सूचना देणे, याचबरोबर विविध आकडेवारी गोळा करून त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविणे आदी जबाबदारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आहे.
या कामांमध्ये कोणताही खंड पडलेला नाही. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान त्याचे पंचनाम्याचा अहवाल तालुक्यातून मागवून तो राज्य शासनाकडे देण्याची जबाबदारी या कार्यालयाकडून करण्यात आली.
कडक नियम…
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात येत आहे. याठिकाणी नागरिकांची थर्मल स्कॅनरने तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. सॅनिटायझर आणि मास्क लावूनच कार्यालयांमध्ये प्रवेश दिला जातो. ज्या अधिकाऱ्यांकडे काम आहे, त्या ठिकाणी गर्दी न करण्याची सूचना देण्यात येते. एकाच व्यक्तीकडे अथवा टेबलावर गर्दी होणार नाही, यासाठी नागरिकांना रांगेत सोडण्यात येते. एक व्यक्ती बाहेर आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला प्रवेश दिला जातो.
तसेच, कार्यालयाच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे, त्यामुळे या सरकारी कार्यालयांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखता आला आहे. याचसह कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेमध्ये सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचे पालन केले आहे. काही कार्यालयांमध्ये जमीन विषयक दाव्यांची सुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी संबंधित कागदपत्रांवर अथवा अर्जांवर निर्जंतुकीकरणाची फवारणी होते. तसेच, अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये प्लॅस्टिकचा कागद लावून सामाजिक अंतर राखण्याचा प्रयत्न केला आहे.
सर्व सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे आणि कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क लावणे, वारंवार हात धुणे, चेहऱ्याला स्पर्श न करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अनावश्यक गर्दी टाळणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत. कर्मचारी व अधिकारी यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन कामे करावीत.
– डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे विभागीय आयुक्त