नवी दिल्ली – देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व याच्या रक्षणासाठी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल कटिबद्ध आहे, असा विश्वास “आयटीबीपी’चे प्रमुख एस. एस. देसवाल यांनी आज व्यक्त केला.
“आयटीबीपी’ आणि लष्कर सध्या लडाखमध्ये तैनात आहे. चीनकडून भारतीय सीमेवर कोणत्याही प्रकारची आगळीक झाली, तर त्या आव्हानाला योग्य प्रकारे हाताळण्यासाठी आपले जवान सज्ज आहेत, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. छत्तरपूरमधील राधा सोआमी सत्संग ब्यास सुविधा केंद्रात नव्याने उभारलेल्या 1000 खाटांच्या कोविड रुग्णालयाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
भारत आणि चिनी सैनिकांमध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री झालेल्या संघर्षामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर आयटीबीपीने चीन-भारतादरम्यानच्या प्रत्यक्ष ताबारेषा आणि इतर क्षेत्रांमधील लडाख प्रदेशातही आपली संख्या वाढवली आहे. भारत-चीन दरम्यान काराकोरम पास पासून अरुणाचल प्रदेशातील जाचेप ला पर्यंत 3,488 किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष ताबा रेषा आहे.