श्रीनगर – जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे 39 आयटीबीपी जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला आज झालेल्या अपघातात सहा जवान ठार झाले आहेत. त्यांचे वाहन दरीत कोसळल्यामुळे हा अपघात झाला. या बसमध्ये दोन अधिकारी आणि 37 जवान होते. हे जवान चंदनवाडीतून पहलगामला जात असताना हा अपघात झाला.
जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीच्या किनाऱ्यावरून जात असताना चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि ते दरीत कोसळले. या प्रकारात अनेक जवान जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीनगरच्या लष्करी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी वेगाने बचाव कार्य हाती घेण्यात आले होते. तेथे 19 रूग्णवाहिका पाठवण्यात आल्या होत्या तसेच मदत पथकेही जागेवर पाठवण्यात आली होती. त्यांनी जवानांना दरीतून वर काढून रूग्णालयात नेले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल ट्विटर संदेशात तीव्र दु:ख व्यक्त करीत मृत जवानांना श्रद्धांतली अर्पण केली आहे.