थिम्फू (भूतान): आसाममधील शेतीचे पाणी अडवल्याचा दावा करणारे वृत्त भूतानने शुक्रवारी स्पष्ट शब्दात फेटाळले. हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि भारतामध्ये गैरसमज पसरवण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर पसरवले गेले असल्याचेही भूतानने म्हटले आहे.
“आसाममधील बक्सा आणि उदालगुरी जिल्ह्यातील शेतीसाठी जाणारे पाणी भूतान अडवत आहे.’ अशा आशयाच्या बातम्या 24 जून पासून भारतात प्रसिद्ध होत आहेत. हे अत्यंत चुकीचे आरोप असून बिनबुडाचे आरोप केले जात आहे. यावेळी पाण्याचा प्रवाह अडवण्याचे काहीच कारण नाही, असे असे भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
आसामचे मुख्य सचिव कुमार संजय कृष्णा यांनी रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटल्यानंतर भूतानने हे स्पष्टिकरण दिले आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये नैसर्गिक अडथळे आहेत, हेच खरे कारण असल्याचेही भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने फेसबुकवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रत्यक्षात भूतान हा अडथळा दूर करण्यास मदतच करत असल्याचे कृष्णा यांनी सांगितले.
भारताच्या विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसामच्या सीमेजवळील भूतानच्या रहिवाशांकडून भारताबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांची जपणूकच केली जाते. मैत्री, सहकार्य आणि पाठिंबा असलेले संबंध या कठीण काळातही सुरूच राहिले पाहिजेत, असेही भूतानने म्हटले आहे.