रायपूर – आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी छत्तीसगडमधील बस्तर भागात एका मेळाव्याचे आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या बैठकीसाठी तब्बल 10 हजार जण उपस्थित होते. दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा स्पेशल सेक्रेटरी रामण्णाचा वारसा कोणी चालवायचा, याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. रामण्णाचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मृत्यू झाला होता.
सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यातील गावांमध्ये 18 ते 20 जूनदरम्यान हा कार्यक्रम झाला होता. या बैठकीला माओवाद्यांचे क्रमांक 1 बटालियनचा प्रमुख नंबाला केशव राव ऊर्फ बसवराजू, मांडवी हिदमा, कोसा, देवजी आणि सुजाता आदी वरिष्ठ म्होरके उपस्थित होते. माओवाद्यांच्या या तीन दिवसांच्या
बैठकीची माहिती आपल्याला मिळाली असून त्याबाबत सविस्तर माहिती घेतली जात आहे, असे छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी माध्यमांना सांगितले. गेल्या 5 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात बस्तरमधील नागरी वसाहतींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांचे एकत्रीकरण प्रथमच झाले आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी 2015 मध्ये सुकमामधील पोट्टुमपल्ली गावात माओवाद्यांचे असेच मोठे एकत्रीकरण झाले होते. यावर्षीच्या एकत्रीकरणाला प्रामुख्याने सुकमा, बिजापूर आणि दंतेवाड्या जिल्ह्यातील गावकरी उपस्थित होते. नारायणपूरमधील काही नागरिकही या एकत्रीकरणाला उपस्थित होते, असे बस्तर विभागातील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या तिन्ही जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या 5.5 लाख इतकी आहे.
या माओवाद्यांच्या संरक्षणासाठी 300 सशस्त्र लढवय्ये आणि त्यांच्या मदतीला 500 जन सैनिकही या भागात तैनात केले गेले होते. या संरक्षणाची जबाबदारी वरिष्ठ माओवादी नेता गणपती याची पत्नी
सुजाता हिच्यावर होती. या एकत्रीकरणासाठी येताना मोबाइल नेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे एकत्रीकरणाचे फोटो उपलब्ध नाहीत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जंगलात झालेल्या या एकत्रीकरणात माओवाद्यांचा इतिहास सांगितला गेला. लुटलेली शस्त्रे यावेळी दाखवली गेली आणि अलीकडच्या काळात मरण पावलेल्या माओवाद्यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली, असे एका महिलेने सांगितले.
क्रीडा स्पर्धा, नृत्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी झाले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शक्तिप्रदर्शनासाठी अशाच प्रकारचे एकत्रीकरण 2004 साली नारायणपूर जिल्ह्यामध्ये झाले होते. सलवा जुडूममुळे माओवादी आता कमकुवत झाले आहेत आणि लवकरच माओवादी अस्तंगत होतील, अशी आशा करणे म्हणजे दिवास्वप्न आहे. कारण ग्रामीण भागातून अजूनही माओवाद्यांना पाठिंबा मिळतो आहे, असे शांतता कार्यकर्त्याने सांगितले.