राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज एकाच दिवशी १७ जण पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती प.स सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. एकाच दिवशी १७ जण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुका हादरला आहे. तालुक्यातील संख्येने पंच्याहत्तरी गाठली आहे.
खेड तालुक्यात करोनाचा शिरकाव वाढला आहे. आज एकाच दिवशी तब्बल १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची संख्या ७५ वर गेली आहे. यामुळे तालुक्यात करोना चा संसर्ग वाढत चालला आहे. कडाचीवाडी येथील एका व्यक्ती दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. तिच्या संपर्कात आलेल्या कडाचीवाडी (७ व्यक्ती, कुरुळी ३ व्यक्ती आणि चाकणची राक्षेवाडी येथील ३ व्यक्ती ) या १३ व्यक्तीचा करोना स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खराबवाडी येथील करोना पोझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन व्यक्तीचा स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील चऱ्होली आणि बिरदवडी येथील प्रत्येकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात आज करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक गाठला आहे.
खेड तालुक्यातील चाकण परिसरात आता सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. चाकण आणि पुणे पिंपरी चिंचवड या शहरांचा जवळून संपर्क आहे. अनेक व्यक्ती, कामगार चाकण आणि पुणे पिंपरी चिंचवड येथे रेडझोन मध्ये ये जा करीत आहेत त्यामुळे करोना संसर्ग वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यात सर्वच व्यवहार सुरळीत झाल्याने नागरिकांची मोठी वर्दळ वाढली आहे. गेली अनेक दिवस प्रशासन आणि नागरिकांनी करोना रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते मात्र आता करोनाने तालुक्यात डोके वर काढल्याने सर्वाणाची झोप उडवली आहे. आज एकाच दिवशी तालुक्यात १७ व्यक्ती करोनाच्या विळख्यात आणल्याने तालुका हादरला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना कोरंटाईन कारण्याचे आरोग्य प्रशासनाचे काम सुरु झाले आहे.
खेड तालुक्यात आज तब्बल १७ जण पॉझिटिव्ह सापडले असून तालुक्यातील करोना बाधितांच्या संख्येने पंच्याहत्तरी गाठली आहे. तालुक्यात यापैकी ४० जण बरे झाले असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. ३३ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. चाकण परिसरात १३ जण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली असून संबंधित परिसरात कंटेनमेंट झोन व बफर झोन करण्याची तयारी सुरु झाली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर खेड तालुक्यात करोनाने मोठा शिरकाव केल्याने नागरिकांनी सतर्क राहावे नियमाचे पालन करून घरीच थांबावे. गर्दीत जाऊ नये गेल्यास मास्क आणि सोशल डिस्टंसचा अवलंब करावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.