नारायणगाव -जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या वृक्ष लागवडीसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सूचनेनुसार वनविभागाने रोपे उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आदिवासी क्षेत्रात तातडीने मनरेगातंर्गत कामे सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तांबे, आंबे आणि जळवंडी क्षेत्रात वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदाईची कामे सुरू केल्यानंतर या ग्रामपंचायतींकडे लागवडीकरिता रोपे उपलब्ध नव्हती.
खासगी रोपवाटिकेतून ही रोपे विकत घेण्याइतक्या आदीवासी भागातील ग्रामपंचायती सक्षम नसल्याने त्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधून वनविभागाकडून रोपं उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लिंब, मोह, भोकर, रीठा, करंज, आपटा, बेल, अशोक, भेंडी, आवळा, हिरडा, बेहडा आदी रोपे उपलब्ध करून दिली.