व्यापारी संघटनेची महाराष्ट्र सरकारला विनंती
नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारने या आठवड्याच्या सुरुवातीला तीन चिनी कंपन्यांबरोबर गुंतवणुकीसंदर्भात सहकार्य करार केला आहे. सरहद्दीवरील परिस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने हे करार रद्द करावेत, असे आवाहन व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेने केले आहे. यासंदर्भात या संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने नुकतेच तीन चिनी कंपन्यांबरोबर सहकार्य करार केले आहेत. मात्र, देशातील सध्याची जनतेची मनःस्थिती पाहता महाराष्ट्र सरकारने हे सहकार्य करार रद्द करणे योग्य ठरेल. गेल्या आठवड्यात तीन चिनी कंपन्यांसह इतर देशांतील 12 कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारबरोबर गुंतवणुकीसंदर्भात सहकार्य करार केला आहे. या करारातील रक्कम 16 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
यामध्ये 3 चिनी कंपन्यांच्या गुंतवणुकीचा वाटा 5 हजार कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र-2 ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील वातावरण गुंतवणुकीसाठी पोषक असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात येत असून परदेशातील मोठ्या कंपन्यांना गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने यातील कंपन्यांसोबत काम करू नये, असे या संघटनेने म्हटले आहे.