माधव विद्वांस
संगीत दिग्दर्शक, गायक तसेच चित्रपट निर्माते हेमंतकुमार यांची आज जयंती. त्यांचे नाव हेमंतकुमार मुखोपाध्याय असे होते. त्यांचा जन्म वाराणसी येथे त्यांच्या आजोळी 16 जून 1920 रोजी झाला. त्यांची आज जन्मशताब्दी आहे. हेमंतकुमार यांचे बालपण आणि शिक्षण कोलकाता येथेच झाले. ते 10 वर्षांचे असतानाच संगीताची त्यांना गोडी लागली होती. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर ते अभियांत्रिकी शिक्षणासाठी जाधवपूर येथील बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. पण त्यांना संगीताची व साहित्याची ओढ असल्याने वडिलांचा विरोध असूनही त्यांनी तांत्रिक शिक्षण सोडले.
शाळेत असताना त्यांची सुभाष मुखोपाध्याय यांच्याशी मैत्री झाली. हेच सुभाष पुढे कवी म्हणून प्रसिद्ध झाले. तसेच त्यांची प्रख्यात लेखक संतोषकुमार घोष यांच्याशी मैत्री झाली. त्यांनी लहान कथा लिहिल्या, तर सुभाष यांनी कविता लिहिल्या आणि हेमंतकु मार यांनी गाणी गायली. असे त्रिकुट जमले होते. उस्ताद फैय्याज खान यांचे विद्यार्थी फणिभूषण बॅनर्जी यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले होते. हेमंतकुमार यांच्यावर रवींद्र संगीताचा प्रभाव होता. त्यांच्या घराचे नावही “गीतांजली’ आहे.
वर्ष 1937 मध्ये हेमंतकुमार यांचे बंगाली गाण्याची कोलंबिया कंपनीने पहिली ध्वनिमु द्रिका प्रसिद्ध केली. या ध्वनिमुद्रिकेमध्ये “जनते जाडी गो तुमी’ आणि “बालो गो बालो मोरे’ ही गाणी होती व त्यांचे संगीतक ार होते शैलेश दत्तगुप्त. त्यानंतर भारतीय ग्रामोफोन कंपनीने (जीसीआय) वर्ष 1984 पर्यंत सातत्याने त्यांच्या गीतांच्या ध्वनिमु द्रिका प्रकाशित केल्या.
वर्ष 1940 मध्ये कोलंबिया कंपनीने त्यांची “कितना दुख भुलाया तुमने’ आणि “ओ प्रीत निभानेवाली’ या हिंदी गाण्यांची ध्वनिमुद्रिका केली. कमल दासगुप्ता यांनी या गाण्यांना संगीत दिले होते तर, गीते फैयाज हाश्मी यांची होती. एक विशेष म्हणजे संगीतकार व गायक म्हणून प्रसिद्ध होण्याआधी त्यांनी दिलेल्या ऑडिशन्समध्ये रेकॉर्ड कंपन्यांनी त्यांना नाकारले होते. वर्ष 1941 मध्ये प्रद र्शित झालेल्या “निमई संन्यास’ या बंगाली चित्रपटात हेमंतकुमारांनी पहिले गाणे गायले.
वर्ष 1947 मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून “अभियत्री’ हा त्यांचा पहिला बंगाली चित्रपट होता. चित्रपट संगीतकार म्हणून त्यांनी 1 इंग्रजी, 138 बंगाली, 57 हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले. त्यांनी सुमारे 200च्या वर गाणी गायली तसेच सुमारे 8 मराठी गाणी गायली. मराठी गाण्यांमध्येही त्यांनी गायलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. “मी डोलकर डोलकर’ या शांता शेळके यांच्या कोळी गीताला हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले व लता मंगेशकर यांनी गायले.
“मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील “मराठी पाऊल पडते पुढे’ हे गीत मंगेशकर भावंडांबरोबर त्यांनी गायले होते. “प्रीतीच्या चांदराती’ या शांताराम नांदगावकर यांच्या भावगीतालाही त्यांनी आवाज दिला आहे. “तुझे असुनी तुजपाशी’ या मधुसुदन कालेक र यांच्या गीतालाही आवाज त्यांचाच आहे. “गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?’ या सुधीर मोघे यांच्या लोकप्रिय गीतालाही त्यांचाच आवाज आहे.
26 सप्टेंबर 1989 रोजी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.