अलिबाग – निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, वीजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर वीजेचे खांब पडल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला असून या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त नुकसान वीजेच्या खांबांचे झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वीजेचे खांब पडले आहेत तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करुन वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच दोन ते तीन दिवसात पूर्ण एसटी लाईनचे काम पूर्ण करावे.
या कामासाठी बाहेरुन जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक मजूर लावायचे असतील, तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल, त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत, असेही तनपुरे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण
सिंधुदुर्ग जिल्हयात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. या चक्रीवादळात जिल्ह्यातली 57 घरे 8 गोठे आणि इतर मालमत्तांची पडझड होऊन 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले आहे.
सार्वजनिक आणि खासगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्यांचे नुकसान 24 लाख 51 हजार इतके आहे. वादळामध्ये मत्स्य आणि बंदर विभागाचे, मच्छिमार, त्यांची जाळी, होड्या यांचे, तसेच शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान झाले नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.