पुणे – भडकाऊ भाषा वापरणे, वस्तुस्थितीला न अनुसरून रिपोर्टींग करणे, धार्मिक तणाव वाढावा, या हेतून घेतलेल्या “डिबेट-शो’ मुळे रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलीस आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते नीलेश नवलाखा यांनी ऍड. असिम सरोदे यांचा कायदेविषयक सल्ला घेऊन ही तक्रार केली आहे. ही तक्रार केबल टेलीव्हिजन नेटवर्क कायद्यानुसार करण्यात आली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या डिबेटमध्ये वापरली जाणारी भाषा, हावभाव, अविर्भाव आणि देह्बोली विशिष्ट धर्माला आणि व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी असते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अनेकदा आक्षेप घेण्यात आले असून, फौजदारी तक्रारीही दाखल झाल्या आहेत.
मात्र, केबल टेलीव्हिजन नेटवर्क कायदा 1955 च्या तरतुदीनुसार पहिल्यांदाच ही 8 मे रोजी ही तक्रार करणयत आली आहे. करोना संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व्यस्त होते, ही समजून घेण्यासारखी बाब आहे. तरीही आता मात्र पोलिसांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नवलाखा यांनी केली आहे. ही चुकीची पत्रकारिता आहे. गुन्हा दाखल झाल्यास अर्णब यांना दोन वर्षे कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते, असे ऍड. असिम सरोदे यांनी सांगितले.