पुणे: राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की नाही, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. मात्र परीक्षा घ्यायचा निर्णय झाला तरी अंतिम वर्षाची 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचे नियोजन पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे कोलमडणार आहे. पुन्हा नव्याने विद्यापीठांना नियोजित वेळापत्रकात बदल करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील प्रतिबंधित क्षेत्रामधील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात आणखी महिनाभरासाठी लॉकडाऊन लागू राहील. त्याचा परिणाम आता विद्यापीठाच्या परीक्षांवर होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 1 ते 31 जुलै दरम्यान घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी परीक्षा घेण्याचे नियोजन केले असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने परीक्षेचे फेरनियोजन करावे लागणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेवरून संभ्रम दूर करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून परीक्षेचा घेण्याचे सूचित केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत परीक्षा घ्याव्या लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परीक्षेचा निर्णयावर ठोस निर्णय होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत आता लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने त्याचाही विचार परीक्षेचा निर्णय घेताना होणार असल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठांने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. येत्या 1 जुलैपासून ही परीक्षेला सुरुवात होणार आहे. मात्र 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असल्याने सर्व परीक्षेची तयारी करणे अशक्य आहे. लॉकडाऊन काळात सर्व महाविद्यालयात परीक्षेची सुविधा उपलब्ध करून देणेही कठीण आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही महाविद्यालये असून, या भागात परीक्षार्थी आहेत. अशा ठिकाणी परीक्षेची बैठकव्यवस्था करणेही कठीण आहे. त्यामुळे या परीक्षांसाठी विद्यापीठांना पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागणार आहे.