नगर -पालकमंत्री जिल्ह्यासाठी प्रतिमुख्यमंत्रीच असतो. त्यामुळे ती निवड खूप विचारपूर्वक व्हायला हवी. नगरची पालकमंत्रीपदाच्या व्यक्तिची निवडच चुकली असल्याचे वाटते. मी पक्षाचा शहर-जिल्हाध्यक्ष आहे. तथापि, पालकमंत्री अजून मलाच ओळखत नाहीत. अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हीच अवस्था असेल, यात दुमत नाही, अशी सणसणीत भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनी आज दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेतेच पालकमंत्र्यांवर नाराज, अशा मथळ्याखाली आज दैनिक प्रभातमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताने पक्षात हडकंप झाला. राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी त्याची दखल घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. अनेक स्थानिक नेत्यांनी प्रभातमधील वृत्ताला दुजोरा दिला. त्यासोबत नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली. दरम्यान या संदर्भात पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षविधाते यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क केला असता त्यांनी अत्यंत खेद व्यक्त केला. ते म्हणाले, “”उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर थेट अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतात. फोन करतात. मात्र, पालकमंत्री खूप मोठे नेते आहेत. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही विश्वासात घ्यायचे असते, हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसावे.
परंतु त्यांना हे कोणी सांगायचे, असाही पक्षातील स्थानिक नेत्यांना प्रश्न पडला आहे. मात्र, त्यातून पक्षात नाराजी आहे, हे आता लपून राहिलेले नाही.” पालकमंत्री मुश्रीफ नगर जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनाही भावच देत नसल्याने त्यांच्याविषयी आमदार, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नाराज आहेत. अनेक दिवसांपासून दबक्या आवाजात सुरु असलेली ही नाराजी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे सुरु झाल्याने पक्षातील मतभेद व खदखद चव्हाट्यावर आली असल्याचे प्रभातमधून प्रकाशित झाले.
दरम्यान, पालकमंत्री यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या मोजक्या समर्थकांनी बाळासाहेब जगताप पक्षातील कार्यकारीणीत आता नाहीत, असेही सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आज शहरातील पदाधिकाऱ्यांचीही नाराजी उघड झाल्याने श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. बाळासाहेब जगताप थेट अजित पवार यांचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांनी उघडपणे घेतलेली भूमिका आज नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली.