पाटबंधारे विभागाचा रडीचा डाव हाणून पाडण्याचा बळीराजाचा निर्धार
केंदूर (वार्ताहर): चासकमान धरणाचे पाणी शिरूर तालुक्यातील कोरेगाव-धानोरे शाखेला चार दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी सोडले होते, त्यामुळे 20 महिलांसह 65 शेतकऱ्यांवर पाटबंधारे विभागाने शासकीय कामात अडथळा आणल म्हणून शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हक्काचे पाणी मागणाऱ्यांवर जर दडपशाही पद्धतीने गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पाटबंधारे विभागाचा रडीचा डाव आम्ही न्यायालयाचे दार ठोठाऊन हाणून पाडू, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, पाणी मिळणार नसल्याने जवळपास निश्चित झाल्याने जातेगाव खुर्द येथील बेंदवस्तीला अखेर शेकऱ्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागले आहे.
कोरेगाव-धानोरे चारीला पाणी सोडण्यासाठी गेल्या तीन आठवड्यांपासून या भागातील शेतकरी लेखी आणि तोंडी पाठपुरावा करीत होते; मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना पुढचा दिवस दाखवत होते त्यामुळे शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. 6) चक्री उपोषण केले, त्यानंतर गुरुवारी (दि. 7) तीन अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन रविवारी (दि. 10) पाणी सोडण्याचे खोटे आश्वासन हे आंदोलन गुंडळण्यात यशस्वी झाले; मात्र शनिवारी (दि. 9) एक पत्रक काढून पाणी देण्यास शक्य नसल्याचे कळविले, त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आणि अखेर शेतकऱ्यांनी रविवारी कोरेगाव-धानोरे चारीचे दरवाजे उघडून पाणी सुरू करून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना एकप्रकारे धक्काच दिला होता.
त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांच्या मदतीने पाणी बंद केले. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी समंजसपणा दाखवून अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले, यावेळी कालव्याच्या दुतर्फा सुरू असलेले कृषिपंप बंद करून वाढलेले पाणी संबंधित चारीला सोडण्याचे अधिकाऱ्यांनी कबुल केले होते; मात्र पुन्हा नियमितपणे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले मात्र आता गुन्हा दाखल करून आंदोलक शेतकऱ्यांचे तोंड बंद करण्याचा रडीचा डाव शासन खेळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार
दरम्यान आम्ही उपोषणाचे हत्यार काढून लढा दिला मात्र ते आंदोलन देखील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे आम्हाला खोटे आश्वासन देऊन आमचे उपोषण हाणून पाडले त्याचबरोबर पोलिसांच्या मध्यस्तीमुळे आम्ही समंजसपणाची भूमिका घेतली, अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य दर्शविले तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे, त्यामुळे यापुढे आता अधिकाऱ्यांना न्यायायलायत खेचू आणि हक्काचे पाणी मिळवूनच राहू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
दोन-दोन पत्रे देवूनही शुक्रवारी (दि. 8) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्यास जबाबदार असलेल्या पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर सरकारी कामात कसूर केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला असून पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. याशिवाय गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने न्यायालयात तातडीने दाद मागणार आहे. हे प्रकरण कायद्याच्या कक्षेत पूर्ण शेतकरी हिताचे होईपर्यंत थांबणार नाही.
-ऍड. दिग्विजय पलांडे