राजगुरूनगर (प्रतिनिधी): खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून परप्रांतीयासह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील १४३० कामगारांना त्यांच्या मूळगावी शासकीय परवानगी घेऊन पाठविण्यात आले आहे अजूनही सुमारे एक हजार कामगारांनी मागणी केली असून त्यांची शासकीय परवानगी घेऊन त्यांना मूळगावी पाठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे असे भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी सांगितले.
खेड तालुक्यात चाकण सेझ मधील कंपन्या व तालुक्यातील पूल, रस्ते, पाणी योजना, जीवो लाईन खोदकाम व मजुरी करणाऱ्या परप्रांतीय व राज्यातील जिल्ह्यांमधील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रशासनाकडे याकामगारांनी मागणी केली होती मात्र प्रसाशनाकडे याबाबत ठोस निर्णय न झाल्याने या कामगाराची पायी जाण्याची भूमिका घेतली होती.
नावनोंदणी करूनही प्रशासनाकडून गाड्या उपलब्ध केल्या जात नसल्याने आणि जाण्यायेण्यासाठी गाडीचा खर्च या कामगारांना परवडत नसल्याने त्यांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात महिला कामगार आणि त्यांची लहान मुले रस्त्याने प्रवास करू लागल्याने येथील पुणे भीम शक्ती संघटनेनेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी प्रशासनाकडे या कामगारांना सोडण्यासाठी परवानगी मागितली.
चाकण एमआयडीसी, सेझ व तालुक्यातील पूल, रस्ते, पाणी योजना, जीवो लाईन खोदकाम व मजुरी करणाऱ्या व मूळगावी जाणाऱ्या या कामगारांची नोंदणी करून त्याना मूळगावी सोडण्याची भूमिका घेतली. राजगुरूनगर येथील पुणे नाशिक महामार्गावरील राहुल पेट्रोल पंपावर त्यांची नोंदणी करून परवानगी घेऊन आतापर्यंत १४३० नागरिकांना त्यांच्या मूळगावी सोडण्यात आले आहे.
भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून परप्रांतीय कामगार व आपल्या राज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. अनेक कामगारांकडे व कुटुंबाकडे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते. मात्र भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून विजय डोळस यांनी हा खर्च उचलला शिवाय या कामगारांना घरी पोहचेपर्यंत दोन वेळचे दोन दिवसांचे जेवण संघटनेच्या माध्यमातून देण्यात आले.
गेली दोन दिवसांपासुन खेड तालुका भीमशक्ती संकघटनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, राजस्थान, बीड,परभणी, उस्मानाबाद वाशीम, या ठिकाणी १४३० कामगार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जीप बसच्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी व वैद्यकीय तपासणी करून पाठविण्यात आले.
यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय डोळस, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड सुरेश कौदरे, राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, स्टेट बँकेचे गिरीश चावरे, भीमशक्ती संघटनेचे अनिल जाधव, दीक्षा डोळस, विक्रांत भोर, धनंजय भागवत, राहील पिंगळे, राहुल थिगळे, सचिन लोंढे,राहुल डोळस आदी उपस्थित होते.
याबाबत विजय डोळस यांनी सांगितले कि, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार,तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन तालुक्यातील जवळपास दोन ते तीन हजार लोकांना मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओरिसा राजस्थान सह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे. अनेक कामगारांकडे पैसे नाहीत. त्यांना जाण्याची सुखरूप व्यवस्था आम्ही केली आहे. शासकीय परवाना घेतल्याने कोणाला अडविण्यात आले नाही. कामगाराना मूळगावी जाणाऱ्या कामगारांसाठी नियम अटी क्षितील कराव्यात. एसटी बस चेदर मोठे आहेत बस च्या माध्यमातून या कामगाराना मोफत त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
परभणी येथे जाणाऱ्या कुटुंबात अनेक लहान मुले होती बस मध्ये जाताना त्यांच्या आई वडिलांनी साडीचा पाळणा करून त्यांना बांधून त्यात झोपवून नेले.या बस मध्ये जवळपास १५ कुटुंबे पाठविण्यात आली. लॉकडाऊनमुळे सुमारे ४५ दिवस या कुटुंबाना रोजगार नव्हता त्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाली होते तर गावाकडे जाण्यासाठी पैसे नसल्याने पायी निघालेल्या कुटुंबाना विजय डोळस यांनी मदत केली. खेड तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी लॉकडाऊन च्या काळात गेली ४५ दिवसजेवण देऊन सांभाळले विजय डोळस यांनी गावी जाण्यासाठी विनामोबदला बस उपलब्ध करून दिल्या याबद्दल या मजुरांनी खेडकरांचे विशेष आभार मानले.