भोर (प्रतिनिधी) – परराज्यात एसटीने प्रवासला हिरवा कंदिल दाखवल्यानंतर वेळू (ता. भोर) येथून पहिली एसटी 25 प्रवासी घेऊन राजस्थानला रवाना झाली आहे. या बसला प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या हस्ते बसला झेंडा दाखविण्यत आला.
राज्यात कामधंद्याचे निमित्ताने आलेल्या मजूर व इतर नागरिकांना पुन्हा त्यांच्या राज्यात घरी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 21 कोटी रुपयांचा निधी परिवहन महामंडळाला दिला आहे. या बसेस या लोकांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे. संबंधित परराज्यातील मजूर व इतर नागरिकांनी मोफत प्रवासासाठी भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात अटी, शर्तींची पुर्तता करुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी केले होते. त्यानुसार राज्यस्थान राजस्थानमधील नोंदणी केलेल्या 25 प्रवाशांना घेऊन पहिली बस रवाना झाली आहे.
“परराज्यातील मजूरांनी व नागरिकांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व करोना विषाणुची कोणतीही लक्षणे नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र तहसील कार्यालयात दाखल करावीत, जेणे करून परराज्यातील लोकांची प्रवासाची सोय करणे सुलभ होईल. – संग्राम थोपटे, आमदार
परराज्यासाठी मोफत तर राज्यासाठी तिकिट काढा…
ही मोफत प्रवासाची सुविधा फक्त परराज्यांतील मजूर व इतर नागरिकांसाठी आहे. राज्यातील मजूरांना एस. टी. चे तिकीट घेवून स्वखर्चाने ज्याच्या त्याच्या जिल्ह्यापर्यंत सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
“भोर आगारातून लागलीच सुरुवातीस 45 एस. टी. बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भोर आगारातील सर्व वाहक-चालकांना कामावर हजर होण्याच्या सूचना केल्या असून आवश्यकते नुसार जादा बसेस सोडण्याची तयारी भोर आगाराने केली आहे. भोर आगारात 110 चालक व तेवढेच वाहक असून प्रत्येक बसबरोबर दोन कर्मचारी असणार आहेत. – बी. एम. सूर्यवंशी, आगार प्रमुख, भोर