पुणे – अंतिम वर्षाच्या पदविका, पदवीपूर्व, आणि पदव्युत्तर परीक्षेसाठी 13 मार्चपर्यंत नियमित वर्ग अध्ययनातून पूर्ण झालेला अभ्यासक्रमच परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात यावा आणि त्यानुसार परीक्षेचे नियोजन करावे, असे आदेश उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिले आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यायीन किंवा विद्यापीठ स्तरीय परीक्षांचे अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जावेत. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे अर्ज प्राचार्यांनी भरून घ्यावेत, असेही उच्च शिक्षण विभागाने म्हटले आहे. संचारबंदीमुळे विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात. तसेच शैक्षणिक वेळापत्रक काय असावे, याबाबत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. राज्य शासनाने या समितीचा अहवाल स्वीकारला असून त्यानुसार समितीने केलेल्या शिफारशीनुसार सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत.
विद्यार्थी तक्रार कक्ष सुरू करा
करोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष सुरू करावा आणि हेल्पलाइन सुरु करण्यात यावी. जिल्हानिहाय समुपदेशक नेमावेत. दि.1 ते 30 जुलै दरम्यान विद्यापीठीय परीक्षांचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे समितीने म्हटले आहे.
परीक्षा घेण्यासाठीही विविध शिफारशी
विद्यापीठांनी प्रभावी व कल्पक पद्धतीने परीक्षांचे आयोजन करावे.ज्यात तीन तासांच्या परीक्षांना ऐवजी दोन तासांच्या परीक्षांचे आयोजन करावे. विविध शिफ्टमध्ये परीक्षांचे आयोजन करता येईल.विद्यापीठांनी त्यांच्या प्रचलित परीक्षांचे नियम, अध्यादेश, अधिनियमांच्या आधारे, ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने परीक्षा आयोजित कराव्यात. विद्यापीठाकडे असलेल्या पायाभूत सुविधांचा पूर्ण विचार करून व सुरक्षित अंतर पाळून या परीक्षा घ्याव्यात, असे समितीने म्हटले आहे.
अंतर्गत व मौखिक परीक्षाद्वारे मूल्यमापन करावे
पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर परीक्षांच्या अंतिम वर्षाचे प्रात्यक्षिके (प्रॅक्टिकल्स) घेताना छोट्या तुकड्यात तसेच कमीत कमी वेळेत पूर्ण दिवसात अनेक तुकड्या, असे करून प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्यात. अंतस्थ व बहिस्थ परीक्षक म्हणून एकाच महाविद्यालयाचे परीक्षक चालतील. मौखिक परीक्षा किंवा प्रकल्प-मौखिक परीक्षा स्काइप, किंवा इतर उपकरणांच्या माध्यमातून घ्याव्यात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलून त्यांचे मूल्यमापन करणे शक्य नसेल तर; त्यांचे जर्नल्स, अंतर्गत परीक्षा व मौखिक परीक्षाद्वारे त्यांचे मूल्यमापन करावेत, असेही उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले.